घरCORONA UPDATEधक्कादायक : मृत्यूनंतर दोन तासाने पोहोचली रुग्णवाहिका 

धक्कादायक : मृत्यूनंतर दोन तासाने पोहोचली रुग्णवाहिका 

Subscribe

मुंबईतील कांजूरमार्ग येथे क्षयरोगाने प्रकृती बिघडलेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तब्बल चार तास फोन करुनही वेळेत न पोहोचणारी १०८ रुग्णवाहिका त्याच्या मृत्यूनंतर तब्बल दोन तासाने पोहचली.

कोणत्याही रुग्णाला वेळेत उपचार मिळावे यासाठी राज्य सरकारने १०८ रुग्णवाहिकेची सेवा सुरु केली. परंतु मुंबईतील कांजूरमार्ग येथे क्षयरोगाने प्रकृती बिघडलेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तब्बल चार तास फोन करुनही वेळेत न पोहोचणारी १०८ रुग्णवाहिका त्याच्या मृत्यूनंतर तब्बल दोन तासाने पोहचली. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोणत्याही रुग्णाला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहचवण्याची हमी देणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेकडून मुंबईसारख्या शहरात अशी सेवा देण्यात येत असेल तर ग्रामीण भागामधील तिच्या सेवेबद्दल शंका निर्माण झाली आहे.

कांजूरमार्गमधील कर्वेनगरमध्ये राहणारा सुशांत साळुंखे (वय २५) हा काही दिवसांपासून क्षयरोगांनी त्रस्त होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्याला अचानक त्रास सुरु होऊन त्याची परिस्थिती अचानक खालावली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्यांच्या कुटूंबाने १०८ या रुग्णवाहिकेला अनेक वेळा फोन केले. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांनाही १०० क्रमांकावर फोन केले. सुशांतच्या कुटुंबीयांप्रमाणे त्यांच्या शेजाऱ्यांनीही १०८ वर फोन केला. परंतु त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. चार तास फोन करूनही १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे तब्बल चार तास मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुशांतने अखेर दुपारी १ वाजता आपले प्राण सोडले. सुशांतच्या मृत्यूनंतर कर्वेनगरमध्ये शोकाकुल वातावरण पसरले असताना सुशांतच्या मृत्यूनंतर दोन तासाने १०८ रुग्णवाहिका आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. सुशांतला योग्य वेळी उपचार मिळाला असता तर त्याचा जीव वाचवता आला असता अशी माहिती त्याचे कुटुंबीय व शेजाऱ्यांकडून देण्यात आली.

सकाळी ९ वाजल्यापासून आम्ही वारंवार १०८ क्रमांकवर फोन करूनही रुग्णवाहिका आली नाही. अखेर एक वाजता माझ्या मुलाचा घरातच मृत्यू झाला. मृत्यूनंतर दोन तासांनी ३ वाजताच्या सुमारास १०८ रुग्णवाहिका आली. वेळेत रुग्णवाहिका आली असती तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता. – प्रकाश साळुंखे, मुलाचे वडील

सुशांत साळुंखे हा एका दुकानात कामाला होता. लॉकडाऊन झाल्यापासून तो घरातच होता. क्षयरोगांनी त्रस्त असल्याने सकाळी अचानक त्याची प्रकृती बिघडली. १०८ रुग्णवाहिकेला फोन केले मात्र रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर तो वाचला असता.        – नितीन चंदनशिवे, समाजसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -