जयगड येथून मुंबईकडे जाणारी श्री सोमनाथ नावाची मच्छीमार बोट पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पालशेत किनाऱ्यावर बुडाली. गेली दोन महिने जयगड येथे वादळामुळे अडकलेल्या मच्छीमारांची बोट मुंबईच्या दिशेने जात असताना पालशेत येथे बुडाली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय. या दुर्घटनेत सर्व खलाश्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
अशी घडली घटना
जयगड येथून मुंबईकडे जाणारी श्री सोमनाथ नावाची मच्छीमार बोट पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पालशेत किनाऱ्यावर बुडाली. या बोटीवरील ६ खलाशी व १ तांडेल यांनी बोट वाचवण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केला. मात्र, समुद्राच्या खोल पाण्यात बोट बुडत असल्याने या सर्वांनी समुद्रात उड्या टाकल्या. परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी २ तास पोहून किनारा गाठला आणि ते ६ जण किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले. गेल्या २ महिन्यांपूर्वी झालेल्या वादळाच्यावेळी मुंबईतील श्री सोमनाथ ही मच्छीमार नौका जयगड किनाऱ्यावर येऊन पोहोचली होती.
गेले २ महिने याच परिसरात ही नौका मच्छिमारी करत होती. ही नौका बुधवारी मुंबईच्या दिशेने निघाली होती. पालशेत बंदर परिसरातून ही नौका पुढे जात असताना पहाटेच्या सुमारास बोटीत पाणी भरू लागले. संकट ओळखून तांडेलने नौका वेगाने किनाऱ्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी वाढतच गेले आणि बोट बुडाली. बोट बुडणार हे लक्षात येताच ६ खलाशांसह तांडेलांनी समुद्रात उडी घेतली. सकाळी साडेसहाच्या सुमारास ते किनाऱ्यावर पोहोचले. मात्र बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांना यश आले नाही.