कोरोना रुग्णांवर करण्यात येणाऱ्या चाचण्यांबाबत आधीच शंका उपस्थित होत असताना पॉझिटिव्ह असलेल्या पत्रकारांना निगेटिव्ह आल्याने घरी पाठवल्यामुळे हा संशय अधिकच बळावला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत केलेल्या जाणाऱ्या चाचण्यांबाबतच्या विश्वासार्हतेचा प्रश्न अधिकच निर्माण झाला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांच्या या चाचण्याबाबत शंका उपस्थित करताच काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करत सरकार व महापालिकेकडून स्पष्टीकरण मागवले आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्याबाबतची शंका आता अधिक दृढ झालेला असून लोकांनी आता या चाचण्यांवर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
मुंबईत १४ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर याबाबतचा चाचणी कस्तुरबासह, केईएम, हाफकिनसह काही खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून केले जात आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच याचे वृत्तांकन करताना याची बाधा होण्याची शक्यता लक्षात घेता टिव्ही. जर्नलिस्ट असोशिएशनच्या मागणीनुसार १७ एप्रिल रोजी पत्रकारांची चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण १६७ पैंकी ५३ पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे २० एप्रिल रोजी या पॉझिटिव्ह पत्रकारांना गोरेगावमधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर या पत्रकारांची दुसरी चाचणी करण्यात आली. यामध्ये यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रविवारी २६ एप्रिल रोजी घरी पाठवण्यात आले. त्यामुळे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही मुद्दे उपस्थित करत हे पत्रकार जर पॉझिटिव्ह होते तर त्यांना आयसोलेशन कक्षात का ठेवण्यात आले नाही. त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन का करण्यात आले होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे कोरोनाची बाधा झालेल्यांच्या संपर्कातील व्यक्तीला क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आल्यानंतर त्यांना तिथे १४ दिवस ठेवणे बंधनकारक आहे. मग पहिला अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आठ दिवसांत दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्यापूर्वीच घरी पाठवणे हा नियमांचा भंग आहे. त्यामुळे याबाबत किरीट सोमय्या यांनी राज्याचे आरेाग्यमंत्री राजेश टोपे तसेच महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे यासर्व मुद्दयाबाबतचे स्पष्टीकरण मागवले आहे. आपण काढलेला निष्कर्ष तथा नोंदवलेला अनुमानाबाबत सरकार तसेच पालिकेनेही आपला अभ्यास अहवाल योग्य असून त्याचा विचार केला जाईल,असे उत्तर दिल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.