भिवंडी शहरातील धामणकरनाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ६० तास उलटूनही इमारतीचा मलबा बाजूला सारून मृतदेह बाहेर काढण्याचे काम बचाव पथकाकडून सुरूच आहे. काल बुधवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बचाव पथकासमोर अडथळे निर्माण होत होते. मात्र भरपावसातही मलब्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरूच राहिले. दरम्यान आतापर्यंत ४१ मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले असून अजूनही मृतदेह शोध मोहीम सुरू आहे.
#UPDATE: The death toll in Bhiwandi building collapse incident rises to 41.
A three-storied building had collapsed in Patel Compound area in Bhiwandi of Thane, Maharashtra on September 21st.
— ANI (@ANI) September 24, 2020
दरम्यान, राज्याचे वस्त्रोद्योग तथा मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी काल, बुधवारी दुर्घटनाग्रस्त जीलानी इमारतीला भेट देऊन या दुर्घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या शहरांची लोकसंख्या वाढली आहे त्या ठिकाणी अशा धोकादायक इमारतींचा प्रश्न उपस्थित होत असल्याने या धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे पुनर्वसन कसे करण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून भिवंडीतील पुनर्वसनाच्या मुद्यावर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल तसेच शासनाकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून आणखी काही मदत हवी असल्यास तीदेखील पूरवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केली आहे.