घरCORONA UPDATEरुग्णवाढीपुढे महापालिकेची यंत्रणाही पडली तोकडी

रुग्णवाढीपुढे महापालिकेची यंत्रणाही पडली तोकडी

Subscribe

पश्चिमेकडील बाधितांमुळे घाटकोपरला हुडहुडी भरल्याचे दिसून येते.

पूर्व उपनगरातील घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये मोडणाऱ्या महापालिकेच्या एन विभागात सुरुवातीपासून कोरोनाची रुग्ण आढळून येत होते. परंतु सुरुवातीला पहिल्या पाच क्रमांकामध्ये असणाऱ्या या महापालिकेच्या ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी आपल्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अन्य महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने येथील संसर्ग एवढा नियंत्रणात आणला होता की, पुन्हा याठिकाणी कोरोनाच्या विषाणुला प्रवेशच मिळणार नाही. परंतु त्यानंतर संथगतीने सुरु झालेल्या संसर्गाचे एवढे वाढले की रुग्णांना उपचार यंत्रणा राबवताना तसेच संशयित रुग्णांचा शोध घेतानाच या ‘एन’ विभागातील महापालिकेची यंत्रणाच तोकडी पडू लागली. मात्र,पश्चिमेकडील बाधितांमुळे घाटकोपरला हुडहुडी भरल्याचे दिसून येते.

घाटकोपर पूर्व व पश्चिम बाजुस १२ एप्रिल २०२० रोजी केवळ  २५ रुग्ण होते. परंतु त्यावेळी हे रुग्ण इतर वॉर्डाच्या तुलनेत अधिकच होते. परंतु यानंतर घाटकोपरमध्ये अशाप्रकारे महापालिकेची यंत्रणा कामाला लागली की त्यांच्याबरोबरच पहिल्या पाचमध्ये असणाऱ्या वॉर्डातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली. या उलट घाटकोपरमधील संख्या कमी होवून त्यांचा क्रमांक खाली घसरत गेला. घाटकोपरमध्ये कोरोना नियंत्रणात ठेवण्याचा जो प्रयत्न झाला होता, त्याचे कौतूकही झाले. परंतु त्यानंतर दबक्या पावलाने चोराने घरात प्रवेश करावा,तसे या विभागात कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे. पण त्यानंतरच दोन महिन्यात ही रुग्ण संख्या वाढून आता २८७८ वर पोहोचली आहे. म्हणजे दोन महिन्यांच्या कालावधी २८५० रुग्ण वाढले. सुरुवातीला या विभागात संथगतीने रुग्ण वाढत होते. त्यामुळेच आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी ११६६ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरीत १६२६ रुग्णांवर उपचार घेत आहे. म्हणजेच मागील १५ ते २० दिवसांमध्येच सुमारे दीड हजारांहून रुग्ण आढळून आल्याचे स्पष्ट होते.

- Advertisement -

या विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी हे सक्षम आहेत. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच काम करत आहेत. परंतु सुरुवातीला एका कोरोनाबाधित रुग्णांच्या अति संपर्कातील व इतर संपर्कातील अशाप्रकारे सरासरी १० ते १२ लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक होते. ते करण्यात आले नव्हते. विभागाचे वैद्यकीय अधिकारी हे या नव्यानेच आल्याने त्यांना विभागाची भौगोलिक रचना माहित नाही. तसेच क्वारंटाईन करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाकडे असल्याने ते केवळ दोन ते तीन लोकांनाच क्वारंटाईन करायचे. त्यामुळे ही बाब लक्षात येताच नगरसेवकांच्या सुचनेनुसार सहायक आयुक्तांनी महापालिका देखभाल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या अति जोखमीच्या लोकांची संख्या वाढवण्यात आली. बाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्वांनाच क्वांरटाईन करण्यात येत असल्याने पुढे पॉझिटिव्ह रुग्णांचीही संख्या वाढू लागली.

याठिकाणी घाटकोपर पश्चिम विभागातील तीन नगरसेवकांच्या प्रभागातच सर्वांधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे पूर्वेच्या तुलनेत पश्चिमेलाच कोरेानाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला. रमाबाईनगर, कामराज नगर, नित्यानंद नगर आदी पूर्वेकडील ठिकाणी रुग्ण आढळून येत असले तरी पश्चिमेकडील भागात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची पळता भूई थोडी होवून यंत्रणाही तोकडी पडू लागली. विभागात रुग्णांना नेण्यास रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही तर मृतांना नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध होत नाही. एवढेच काय महापालिकेचे राजावाडी रुग्णालय सदानकदा भरलेलेच. कुर्ला भाभात जागा नाही. त्यामुळे शीव रुग्णालयाचा रस्ता धरायचा. परंतु थोडेफार पैसे गाठीला असलेल्या रुग्णांना दाखल करण्यासही खासगी रुग्णालयांत जागा नाही.

- Advertisement -

मात्र, झोपडपट्टी परिसर असूनही सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटायझेशन करण्याकरता खासगी स्वयंसेवी संस्था नेमण्यास झालेला विलंब यामुळेही झोपडपट्टी भागांमध्ये योग्यप्रकारे काळजी घेतली जात नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे दुलर्क्षित बाबही कोरोनाच्या संसर्गाचे प्रमुख कारण ठरले गेले असावे,असेही बोलले जात आहे.

घाटकोपर एन विभागातील रुग्णांची स्थिती

एकूण बाधित रुग्ण :  २८७८

बरे झालेले रुग्ण :  ११६६

उपचार घेत असलेले रुग्ण :  १६२५

रुग्ण दरवाढीचा दर : ३.४ टक्के

कोणत्या भागांमध्ये आढळून आले कोरोनाबाधित रुग्ण

कामराज नगर, रमाबाई नगर, पटेल चौक, नित्यानंद नगर, गौतम नगर, बर्वे नगर,  रामजी नगर, भटवाडी, राजावाडी पाईप लाईन, गावदेवी रोड, वर्षा नगर, हनुमान नगर,

माझ्या प्रभागात रामनगर, हनुमान नगर,वर्षानगर,आनंदगड, संजय गांधी नगर, जय मल्हार नगर,  सोमेश्वर नगर आदी ठिकाणी आतापर्यंत १५०हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील वर्षानगर परिसरात मागील काही दिवसांपासून बाधित रुग्ण आढळून आलेले नाहीत. आतापर्यंत  २५ ते २६ जणांचे मृत्यू झालेले आहेत. मात्र, महापालिकेच्यावतीने रुग्णांची शोध घेण्यासाठी घरोघरी जावून ताप दवाखान्यांमार्फत तपासणी मोहिम राबवण्यात आली. तसेच येत्या मंगळवारीही महापालिकेच्यावतीने मान्सूनपूर्व साथीच्या आजारांसह कारोना रुग्णांसाठी शिबिर आयोजित केला आहे. – स्नेहल मोरे, स्थानिक नगरसेविका, शिवसेना पुरस्कृत अपक्ष

किरोळ गाव आणि नित्यानंद नगर आदी भागांसह काही इमारतींमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले. मात्र, घाटकोपर राजावाडी रुग्णालय असले तरी तिथे जागा नाही आणि खासगी रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांमध्ये पाठवता येत नाही. अनेक खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा महापालिकेच्या ताब्यात आल्याने गरीब रुग्ण दाखल झाले. परंतु बरे होऊन घरी परतताना रुग्णांच्या हाती दीड ते दोन लाखांचे बिल ठेवण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही आणि खासगी रुग्णालयांचे दर परवडत नाही. आतापर्यंत आपण ६५ दिवस दरदिवशी १५०० लोकांना जेवण पुरवले. परंतु महापालिकेची कोणतीही मदत न घेता.याशिवाय ५५०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. – बिंदु त्रिवेदी, स्थानिक नगरसेविका, भाजप

रायगड नगर आणि आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर सोसायटी या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सुरुवातीला माझ्या प्रभागात ४ ते ५ रुग्ण होते. परंतु जेव्हापासून दारुचे दुकान उघडले व त्यानंतर परप्रांतिया गावी निघून गेले, तेव्हापासूनच माझ्याप्रभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. आज ही संख्या  ६०पर्यंत पोहोचलेली आहे. विभागातील खासगी रुग्णालयांमध्ये कुठेही सरकारी दराप्रमाणे उपचार होत नाही. आधी दीड ते दोन लाख रुपये डिपॉझिट भरायला सांगितले. तसेच दिवसाचे २५ ते ३० हजार एवढे बिल आकारले जाते. मग सामान्य माणूस कुठून भरणार आहे. सरकारच्या यावर कुठेही अंकूश दिसून येत नाही. – ज्योती हारुन खान, स्थानिक नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस

इंदिरा नगर, गणेश नगर आदी भागांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले. आतापर्यंत विभागात २५०हून अधिक रुग्ण आढळले. झोपडपट्टी परिसर अधिक असल्याने हे प्रमाण वाढले आहे. झोपडपट्टयांमधील सार्वजनिक शौचालयांमध्ये सध्या एकदाच सॅनिटायझेशन केले जाते. सोमवारपासून नवीन संस्था नियुक्त केली जाणार असून त्यानंतर दिवसाला सहा वेळा सॅनिटायझेशन केले जाणार असल्याचे विभागाचे सहायक आयुक्त आंबी यांनी आश्वासन दिले. विभागाचे सहायक आयुक्त व त्यांच्या टिमचे योग्य सहकार्य लाभत असल्याने रुग्ण संख्या वाढत असली तरी यातून  निर्माण होणारे प्रश्न लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून सोडवले जातात.आतापर्यंत राजावाडी रुग्णालयात पीपीई किटसह मास्क व फेस मास्कचे वाटप केले असून याशिवाय महापालिका व पोलिस कर्मचाऱ्यांनाही मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले आहे. – डॉ. अर्चना संजय भालेराव, स्थानिक नगरसेविका, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -