मुंबई महापालिका शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल यंदा कमी लागल्याने पुन्हा एकदा प्रशासनाच्या चिंतेचा विषय ठरला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये खासगी शाळांच्या तुलनेत सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देवूनही हा निकाल कमी लागला आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व विभागांमधील महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिक तयार करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. विशेष म्हणजे २०१४-१५मध्ये तत्कालिन शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांच्या संकल्पनेतून एकलव्य अभ्यासिका उपक्रम राबवला होता. परंतु शिक्षण समिती अध्यक्षपद शिवसेनेकडे आल्यानंतर या उपक्रमाकडे त्यांनी दुर्लक्ष केला आणि आता हा उपक्रम पुन्हा राबवण्याची मागणी करत आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे.
महापालिका शाळांमधील दहावी विद्यार्थ्यांचा निकाल यंदा ५३ टक्के एवढा लागला आहे. त्यातुलनेत मागील वर्षी हा निकाल ७३ टक्के एवढा होता. त्यामुळे निकाल वाढवण्याऐवजी त्याची टक्केवारी कमी झाल्याने याला जबाबदार कोण असा सवाल सभागृहनेत्या विशाखा राउुत यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे केला. शिक्षण समितीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या मंजुर्या देवून २७ शालेय वस्तूंसह व्हर्च्युअल क्लासरुम, ई लॅब आदी प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. त्यामुळे निकालात वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु तसे घडले नाही,असा त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यात महापालिका शाळांमधील दहावीच्या मुलांचा परीक्षेचा निकाल वाढवण्यासाठी सर्व विभागांमध्ये अभ्यासिका सुरु करावीत. दहावीच्या मुलांसह इतर विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा म्हणून या अभ्यासिक महापालिकेच्या शाळांमध्ये सुरु करण्यात याव्यात,अशी मागणी विशाखा राउुत यांनी केली. त्यामुळे हा हरकतीचा मुद्दा राखून हा प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
सन २०१४-१५मध्ये तत्कालिन शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांच्या संकल्पनेतून महापालिका शाळांमध्ये एकलव्य अभ्यासिका सुरु करण्यात आल्या होत्या. मुंबईतील तब्बल १५०ते १७५ शालेय इमारतींमध्ये या अभ्यासिका तयार करण्यात आली होती. या अभ्यासिकेला समाजातून चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत असताना तसेच या मुलांच्या सेवेसाठी संत निरंकारी संस्थेचे ४०० हून अधिक स्वयंसेवक कार्यरत असतानाही पुढील वर्षांतच हा उपक्रम गुंडाळण्यात आला.