मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर पोहचण्यासाठी शटल सेवा सुरू केली आहे. मात्र रेल्वेकडून चालविण्यात येणाऱ्या शटल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असून सोशल डिस्टिन्सिंगचे तीनतेरा वाजत असल्याने कर्मचाऱ्यांने नाराजी यापूर्वी व्यक्त केली होती. मात्र तरी सुद्धा रेल्वेकडून दखल न घेतल्यामुळे संतापलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी सोमवारी ५.३० वाजता विद्याविहार रेल्वे स्थानकात रेल रोको केला, त्यानंतर तब्बल एक तासानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांची स्पेशल ट्रेन कर्जतसाठी रवाना झाली
मध्य रेल्वेवरील परेल, माटुंगा हे दोन वर्कशॉप उघडण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले होते. गेल्या काही दिवसापासून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल लोकल सोडण्यात आली होती. गर्दी होत असल्याने लोकल रद्द करून शटल सेवा सुरु करण्यात आली होती. त्यामध्येही कर्मचाऱ्यांनी दाटीवाटीने प्रवास केल्याचे व्हिडिओ, फोटो व्हायरल झाल्याने प्रशासन कर्मचाऱ्यांची सुरक्षा करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांनी यासंबंधित रेल्वेकडे तक्रारी केल्या होत्या.
मुंबई विभागात ३ कर्मचारी स्पेशल गाड्या कर्जत आाणि कसाराकरिता चालविण्यात येतात.कर्मचाऱ्यांच्या उद्रेकानंंतर दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास आणखी एक गाडी चालविण्यात येणार आहेत.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क, मध्य रेल्वे
तसेच आता मध्य रेल्वे मार्गावर परळ, माटुंगा पाठोपाठ विद्याविहार येथील कारशेड सुद्धा सुरू झाले आहे. त्यासोबतच पश्चिम रेल्वे मार्गावरील वर्कशाॅप सुद्धा १ जून पासून सुरू करण्यात आल्याने, कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची संख्या वाढली आहे. त्यामुळे पहिल्या रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या स्थानकांवरच रेल्वे कर्मचाऱ्यांमूळे शटल सेवा हाऊसफुल होत असल्याने, पुढच्या रेल्वे स्थानकांवर कर्मचाऱ्यांना उभे राहायला सुद्धा जागा मिळत नाही.
विद्याविहार रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचा रेल रोको
रेल्वे कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या विशेष गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोकं असल्याने,social distancing पाळणे शक्य नसल्याने संताप व्यक्त करत रेल्वे कर्मचारी रेल्वे रुळावर उतरले (5.45 pm)#Mumbaitrainupdates@AmhiDombivlikar pic.twitter.com/1xGuA3ny0v— Mumbaitrainupdates™??? (@Mumbaitrainupd8) June 1, 2020
मिळलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून कर्जतसाठी कामगार स्पेशल ट्रेन निघाली. ही गाडी कुर्ला ते विद्याविहार स्थानकादरम्यान आली असता, गाडीत बसायला जागा नसल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी रेल्वे ट्रॅकवर उतरत गाडी रोखली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढून संध्यकाळी सहा वाजेच्या सुमारास गाडी कर्जतकडे रवाना केली.