ठाणे शहरात मोठया प्रमाणात झाडांची छुप्या पध्दतीने कत्तल सुरू असल्याच्या पर्यावरण तज्ञांच्या अनेक तक्रारी असतानाच, आता वागळे इस्टेट परिसरात एमआयडीसीच्या जागेवरील जुन्या झाडांची कत्तल केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी स्थानिकांनी ठाणे महापालिकेत तक्रार केली आहे. त्यामुळे ठाण्यात झाडांची कत्तल सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे पश्चिमेतील वागळे इस्टेट किसननगर परिसरातील एमआयडीसीच्या प्लॉटवर असलेली वड, पिंपळ, जांभूळ आणि नारळाच्या सुमारे ५० वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल केली जात असल्याची तक्रार मनसेने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे केली आहे. सदर प्लॉट हा एका विकासकाने घेतल्याने विकासकाकडून बिनधास्तपणे झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. शहरात छुप्या पध्दतीने झाडे व फांद्यांची कत्तल केली जाते. पालिकेकडे अनेक तक्रार करूनही पालिकेकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याची नाराजी मनसेचे प्रभाग अध्यक्ष प्रमोद परब यांनी व्यक्त केली. काही वेळा वृक्षतोड करणे गरजेचे असते पण त्या बदल्यात काही पटीने वृक्षांची लागवड व जोपासना केली जात नाही. त्यामुळे छुप्या पध्दतीने विना परवानगी झाडांची कत्तल करणार्यांवर पालिकेने कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
वागळे इस्टेट येथील मे. शहा डेव्हलपर्स यांच्यामार्फत विकसित करण्यात येणार्या जागेवर वृक्षतोड झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या जागेची स्थळपाहणी केली असून त्यांना वृक्ष तोडण्याबाबत वृक्ष अधिकारी एमआयडीसी वागळे इस्टेट यांनी परवानगी दिली आहे. डॉ. अनुराधा बाबर, सहायक आयुक्त , ठामपा
एकीकडे राज्य सरकारकडून वृक्ष लागवडीचे संदेश दिले जातात, मात्र दुसरीकडे झाडांची कत्तल केली जाते हा विरोधाभास दिसून येतो. त्याची तक्रार केल्यानंतर झाडे तोडण्याची परवानगी घेतल्याचे सांगितले जाते. पण ५० ते ६० वर्षांची वड-पिंपळासारखी जुनी व मोठी झाडे तोडली ंजातात. मात्र, जितकी झाडे तोडली जातात त्या प्रमाणात झाडांची लागवड केली जाते का ? हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. पालिकेच्या वृक्ष विभागाचे याकडे लक्ष नाही.– प्रमोद परब,प्रभाग अध्यक्ष,मनसे