घरमुंबई'केंद्राच्या मदतीची प्रतिक्षा न करता राज्य सरकारने मदतीचा ओघ वाढवावा'

‘केंद्राच्या मदतीची प्रतिक्षा न करता राज्य सरकारने मदतीचा ओघ वाढवावा’

Subscribe

केंद्र सरकारची मदत मिळण्यास वेळ लागतो हे लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील पूरग्रस्त भागात तातडीने मदतीचा ओघ वाढवावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यातील पूरग्रस्त भागात झालेले नुकसान पाहता १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारकडे ६ हजार कोटी रुपयांची मागणी केलेली असली तरी केंद्र सरकारची मदत मिळण्यास वेळ लागतो हे लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने मदतीचा ओघ वाढवावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार 

पूरग्रस्त भागात शेतीची अपरिमित हानी झालेली आहे. ऊस, केळी, भाजीपाला, सोयाबीन, मका या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. पशुधनाची या पुरात वाताहात झालेली आहे. सरकारने पशुधनासाठी जाहीर केलेली ३० हजार रुपयांची मदत अपुरी असून पशुधनच द्यावे. या भागातील शेतकऱ्यांची सर्व थकित कर्ज माफ करुन नवे कर्ज उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. पुरात झालेल्या घरांची पुनर्बांधणी करावी, छोट्या दुकानदारांनाही तातडीने आर्थिक मदत करावी तसेच पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा जीएसटी माफ करावा, विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्कही माफ करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

सरकारवर टीका 

महाराष्ट्रावर एवढी मोठी आपत्ती ओढवलेली असताना केंद्र सरकारने त्याची अजून गंभीर दखल घेतलेली नाही. शेजारच्या कर्नाटकमध्ये दोन-दोन केंद्रीय मंत्री येऊन पाहणी करुन गेले पण महाराष्ट्रातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी वेळ दिला नाही. केंद्र सरकारमध्ये राज्यातील आठ मंत्री आहेत. त्यांनी या संकटावेळी महाराष्ट्रासाठी भरीव आर्थिक मदत आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण त्यांच्याकडून प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. महापुरातून जनता अजून सावरलेली नसताना मुख्यमंत्र्यांना मात्र पुन्हा एकदा आपल्या प्रचार यात्रेची ओढ लागलेली दिसते. राज्य संकटात असताना प्रचाराचे वेध लागणे हा असंवेदनशिलपणाचा कळस आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -