घरमुंबईयंदा नवरात्रीत आवाज पोलिसांचाच

यंदा नवरात्रीत आवाज पोलिसांचाच

Subscribe

मीरा भाईंदरमध्ये नवरात्रीत ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री 10 च्या वेळेची पोलिसांकडून कडक अंमलबजावणी केली जात असल्याने यंदा आवाज पोलिसांचाच असल्याचे चित्र आहे. 10 ते सव्वा दहा दरम्यान बहुतांश मोठे आणि व्यावसायीक आयोजकांचे कार्यक्रम बंद होत असल्याने नागरीकांनी ध्वनी प्रदुषणाच्या जाचातुन सुटका झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. तर कार्यक्रम लवकर बंद होत असल्याने तरुण व शाळकरी मुलं घरी लवकर परतत असल्याने पालकांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे.

शहरात नवरात्रला सुरवात झाली असुन विधानसभा निवडणुका असल्याने नवरात्रीला राजकीय रंग आला आहे. राजकारणी व लोकप्रतिनिधींमध्ये गरबा आयोजनासाठी वेगवेगळे गायक व कलाकार आणणे, बक्षिसं यात स्पर्धाच लागली आहे. ऑर्केस्ट्रा साऊंड, डिजे सारख्या कानठळ्या बसवणार्‍या ध्वनियंत्रणांचा दणदणाट चालला आहे. उमेदवार व त्यांचे समर्थक नवरात्रीच्या आड आपला प्रचार – प्रसार करण्याचा शक्यतो खटाटोप करताना दिसत आहेत.

- Advertisement -

यंदाच्या नवरात्रीला सुरुवातीला ध्वनिप्रदुषणाने होणार्‍या त्रासाने वैतागलेल्या जागरुक नागरीकांनी ध्वनिप्रदुषणाबाबत तक्रारी चालवल्या. पोलिसांनी स्वत:हून गस्त घालुन रात्री 10 नंतर ध्वनिप्रदुषण करणार्‍यांवर कारवाई करतानाच गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरु लागली. त्यानंतर पोलीसांनी ध्वनिप्रदुषणाने त्रासलेल्या नागरीकांना सुखद धक्का देतानाच मोठा दिलासा दिला. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ध्वनिप्रदुषणाचा वाढता धोका आणि सामान्य नागरीकांना होणारा त्रास पाहता पोलिसांनी रात्री 10 वाजता ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद बंद करण्याचे आदेश दिले होते.

ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी पोलीस अधिकार्‍यांच्या क्राईम बैठकीत ध्वनि प्रदुषण रोखण्यासह वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले होते. वरिष्ठांच्या आदेशांमुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी देखील कोणाचा मुलाहिजा न ठेवता वेळेची मर्यादा पाळण्याची कार्यवाही चालवली आहे. काही ठिकाणी आयोजक मुजोरी करत असल्याने त्याठिकाणी पोलीसच तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

– यंदा पोलिसांनी स्वत:हून ध्वनि प्रदुषण नियमांचे काटेकोर पालन करायला लावल्याने माझ्या सारख्या ज्येष्ठ नागरीकांसह रुग्ण, मुले, महिला व नागरीकांना दिलासा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे 10 वाजता कार्यक्रम बंद होत असल्याने घरातील लहान तसेच तरुण मुले – मुली लवकर घरी परतत असल्याने पालकांच्या जीवाला लागणारा घोर यंदा मिटला आहे. त्या बद्दल पोलिसांचे आभार.
-अनंत आंगचेकर, ज्येष्ठ नागरीक, भाईंदर

नवरात्रीचे धार्मिक पावित्र्य राहिलेले नाही. केवळ मौजमजा चालली आहे. नवरात्रीच्या नावाने मुले मुली रात्री उशीरापर्यंत नाहक फिरत राहतात. ते बंद झालेच पाहिजे. पोलिसांनी रात्री उशीरा मुले मुली दिसल्यास सरळ त्यांना घरी पाठवले पाहिजे. ध्वनिक्षेपकची रात्री 10 ची वेळ काटेकोर पाळली जावी. आवाजाची पातळी देखील तपासली जावी. 12 वाजेपर्यंतची सवलत बंद करावी. वाटल्यास शेवटचाच एक दिवस द्यावा.
-जागृती प्रशांत केळकर, गृहिणी, भाईंदर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -