मुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकादरम्या ३ प्रवासी गर्दीमुळे लोकलमधून पडले आहे. आज सकाळपासून मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर प्रचंड गर्दी आहे. परंतु, मध्य रेल्वे प्रशासनाकडून रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या सोडल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकांवर निर्माण झाली. अखेर तीन प्रवासी रलोकलमधून खाली पडल्यावर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून रविवारचे वेळापत्रक रद्द करुन जादा गाड्या मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहेत. दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाबाबत प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रचंड गर्दीमुळे मुंब्रा-कळवा दरम्यान ३ जण लोकलमधून पडले
प्रचंड गर्दीमुळे मुंब्रा-कळवा दरम्यान ३ जण लोकलमधून पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तिनही जण गंभीर जखमी झालेले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये दोन पुरुषांचा तर एका महिलेचा समावेश आहे. या तिन्ही जणांना कळवाच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर आज सकाळपासून रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या धावत आहेत. मंगळवारी मुसळधार पावसामुळे मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गाची वाहतूक कोलमडली होती. मध्य रेल्वे मार्गावर तर वाहतुकीचे कंबरडे मोडले गेले होते. मंगळवार सकाळपासून फक्त कल्याण ते ठाण्यापर्यंत गाड्या धावत होत्या. त्यानंतर संध्याकाळी पाऊस बंद झाल्यावर रेल्वे वाहतूक संत गतीने सुरु झाली. त्यानंतत आज सकाळपासून रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या धावत आहेत.
दोन महिलांना आली भोवळ
रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या धावत असल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. गाड्या कमी असल्यामुळे प्रवासी जमेल तसे गाडीत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकावर भरपूर गर्दी निर्माण झाली आहे. या गर्दीमुळेच मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या एका गाडीमधून ३ जण पडले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनावर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. मंगळवारी पावसामुळे राज्य सरकारने सरकारी सुट्टी जाहीर केली होती. मात्र, बुधवारी नेहमीप्रमाणे सर्व चाकरमाणी आपल्या कार्यालयांमध्ये जाण्यासाठी निघाले. मात्र, लोकल गाड्या उशिराने धावत असल्यामुळे मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर निर्माण होत आहे. गर्दीत अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे दोन महिलांना गर्दीमुळे भोवळ आली आहे.