कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशभरात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. रेल्वेसह सर्वच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही या काळात बंद करण्यात आलेल्या आहे. मात्र यात जीवनाश्यक वस्तूचा तुटवडा पडू नये. यासाठी भारतीय रेल्वेच्या पार्सल आणि मालगाड्या सुरु आहे. या लॉकडाऊन काळात आजी आणि काकांची औषध रेल्वे विभागाने थेट ठाण्यावरून रायगडला पोहोचवली. त्यामुळे या खडतर परिस्थितीतही मध्य आणि कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७३ वर्षीय शैला रेणोसे (आजी) आणि ५८ वर्षीय शरद मोरे (काका) हे रायगड जिल्ह्यातील फाळकेवाडी येथे राहतात. गेल्या काही दिवसापूर्वी शैला रेणोसे हेमॅटॉलॉजीच्या उपचारासाठी ठाण्याला आल्या होत्या. त्यानंतर शरद मोरे यांचे सुद्धा पोटाचं ऑपरेशन झाले होते. हे दोघेही आपला नातू अक्षय महापदीकडे ठाण्यात राहत होते. उपचार घेऊन आणि एक महिन्यांचे औषध घेऊन लॉकडाऊनपूर्वी गावी हे दोघेही निघून गेले होते. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे रेल्वेसह सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली होती. आता हा लॉकडाऊन वाढविल्यामुळे शैला आणि शरद या दोघांचे एक महिन्यांची औषध संपले असून त्यांना त्रास होत होता. तिकडे औषध सुद्धा मिळत नव्हती. त्यामुळे ठाण्यातून औषध पाठवणे फार गरजेचे होते. या कठीण परिस्थितीत शैला यांचे नातू अक्षय महापदी ठाण्यातून औषधं घेतली, पण ती गावी पाठवायची कशी हा प्रश्न अक्षय समोर उपस्थितीत झाला होता. त्याने कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेला संपर्क केला असता वाणिज्य आणि पार्सल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओखा तिरुअनंतपुरम गाडी जात असल्याची माहिती दिली. मात्र, ही गाडी विन्हेरे येथे थांबा नाही. पण अत्यावश्यक औषधं असल्यामुळे गाडी थांबवून आम्ही औषध देऊ असं रेल्वे अधिकाऱ्यांनी अक्षयला सांगितले.
त्यानंतर अक्षय मंगळवारी सकाळीच औषधांचा बॉक्स घेऊन ठाण्यावरून पनवेलला गेला. औषधाचा बॉक्स रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिला. आज सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी गाडी औषधे घेऊन विन्हेरे रेल्वे स्थानकात पोहोचली. तेव्हा रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी गाडी थांबून ती औषध तात्काळ रुग्णांचा नातेवाईकांना दिली. कोकण आणि मध्य रेल्वेचे सहकार्य आणि मदतीमुळे अक्षयची आजी आणि काका सुरक्षित आणि सुखरूप आहे. त्यामुळे त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व रेल्वे प्रवासी वाहुतक बंद आहेत. मात्र, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठासाठी रेल्वेच्या पार्सल गाड्या आणि मालगाड्या सुरू आहे. काल आम्हाला माहिती मिळाली की रायगडमध्ये दोघां वृद्धांना औषधाची गरज आहे. त्यामुळे त्यांना औषध पोहोचवणे गरजेचे होते. त्यामुळे तात्काळ आम्ही औषधांचे पार्सल रेल्वे कर्मचाऱ्यांना देऊन ती पाठविण्याची व्यवस्था केली.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे