‘राम की जन्मभूमी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी आणि प्रदर्शनासाठी घेतलेल्या सुमारे सव्वाकोटी रुपयांचा अपहार करुन एका चित्रपट निर्मात्याची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्रिलोकचंद माणिकलाल कोठारी आणि राजेश देवविलास सिंह या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशी केली फसवणूक
उत्तर प्रदेशातील लखनऊ मधील शहादतगंज शहरात सय्यद वसीम रिझवी हे व्यापारी त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मार्च २०१९ रोजी त्यांनी ‘राम की जन्मभूमी’ नावाच्या एका चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनसाठी ते चित्रपट निर्माता विवेक अग्रवाल यांच्यासोबत अंधेरीतील सिद्धीविनायक इमारतीच्या त्रिशा स्टुडिओमध्ये गेले होते. तिथे त्यांनी पोस्ट प्रॉडेक्शन आणि डबिंगचे काम पूर्ण केले. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्डाची रितसर परवानगी घेतली होती. यावेळी त्यांना त्रिशा स्टुडिओचे मालक त्रिलोकनाथ कोठारी आणि त्यांचा सहकारी राजेश सिंह यांनी ते चित्रपट वितरक असून त्यांचे सागर प्रॉडेक्शनचे एक कार्यालय अंधेरीतील क्रिस्टल प्लाझा इमारतीमध्ये असल्याचे सांगितले होते. यावेळी या दोघांनी त्यांना त्यांच्या कंपनीने चित्रपट प्रदर्शित केल्यास त्यांना कमी खर्चात चांगले कलेक्शन मिळेल, असे सांगितले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनीही त्यांच्या कंपनीच्या वतीने त्यांचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या त्रिशा स्टुडिओ कार्यालयात त्यांची भेट घेतल्यानंतर या दोघांनी भारतात ५०० हून सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित्त करुन दहा कोटी रुपये व्यवसाय करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या दोघांनी त्यांच्याकडून चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तसेच अन्य कामासाठी सुमारे सव्वाकोटी रुपये घेतले. मात्र हा चित्रपट त्यांनी दुय्यम सिनेमागृहात प्रदर्शित करुन त्यांनी केलेल्या कराराचा भंग केला होता. याबाबत विचारणा केल्यानंतर या दोघांनी त्यांना भाई लोकांनी त्यांना चित्रपट प्रदर्शित करु नका म्हणून धमकी दिल्याचे सांगितले.
मात्र ते दोघेही सांगत असलेली माहिती खोटी होती, त्यांनी खोटी आश्वासने देऊन त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आंबोली पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा तपास प्रॉपटी सेलकडे वर्ग केला होता. हा तपास हाती येताच या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्रिलोकचंद्र कोठारी याला अंधेरी तर राजेश सिंह याला माझगाव परिसरातून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी या संपूर्ण व्यवहारात आर्थिक फसवणुक केल्याची कबुली दिली. तसेच भाई लोकांकडून धमकी आल्याची खोटी माहिती देऊन त्यांनी दिलेल्या पैशांचा परस्पर अपहार केला होता. काही सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित होऊनही त्या सिनेमागृहाच्या कलेक्शनची माहिती लपवून ठेवली होती. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांनी अशाच प्रकारे अन्य काहींची फसवणुक केली आहे का? याचा आता पोलीस तपास करीत आहेत.