यापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेच्या दिवशी नगरसेवक, अधिकारी यांना जेवण देण्यात येत होते. मात्र यापुढे महासभेत जेवण करू नका, तसेच चहा पिऊ नका, हा प्रकार बंद करा असा निर्णय महापौर पंचम कलानी यांनी घेतला. तसे पत्र त्यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले असून नगरसेवकांना देखील आवाहन केले आहे.
पुणे-पनवेल-कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकेत महासभेच्या दिवशी सभागृहात जेवणाचा प्रकार नाही. मात्र हा प्रकार उल्हासनगर पालिकेत सुरू होता. महासभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असते अशा वेळी विषय भरकटू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. महासभेच्या दिवशी जेवणाची वेळ ठरवा आणि आपापल्या किंवा महापौर, स्थायी समिती यांच्या दालनात येऊन जेवण करण्याचे आवाहन महापौर पंचम कलानी यांनी केले आहे. तसेच या निर्णयाचे पालन करण्याची विनंती केली आहे.
जगावेगळ्या वेळेची महापालिका
उल्हासनगरात सर्वपक्षीय 78 व स्वीकृत 5 असे 83 नगरसेवक आहेत. मुळात इतर महापालिकेत महासभेची वेळ ही सकाळी 11 च्या सुमारास असते. उल्हासनगरात मात्र सायंकाळी 4 ची वेळ असते. क्वचितच वेळी लवकर महासभा घेतली जाते. मात्र उल्हासनगर पालिकेच्या महासभेची वेळ सायंकाळची असल्याने बहुतांश नगरसेवक-नगरसेविका दुपारचे जेवण आटोपून महासभेत येतात. त्यामुळे जेवण बंद केले तर काही फरक पडत नाही, अशा प्रतिक्रिया काही नगरसेवकांनी व्यक्त केली.