घरताज्या घडामोडीनाशिक-मुंबई महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा

नाशिक-मुंबई महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा

Subscribe

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील रस्ते निकृष्ट असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तात्काळ रस्त्यांची कामे पूर्ण करावी. टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण केली नाही तर संबंधित यंत्रणेवर कारवाई करावी, असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी दिले.

भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझा या रस्त्याची दुरावस्था,वाहतुकीची कोंडीच्या उपाययोजनांबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, माजी विधानपरिषद सदस्य जयवंतराव जाधव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त के.गोविंदराज, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक आणि ठाणेचे सचिव अन्शुमली श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

- Advertisement -

टोल नाक्यांची कामे करताना सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामात समन्वय ठेवावा. पावसामुळेदेखील या रस्त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझा या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करावी आणि कामांना तात्काळ गती द्यावी, अशी सूचना भुजबळ यांनी केली.

यावेळी समीर भुजबळ म्हणाले, मुलुंड टोल नाक्यापासून वाहतूक कोंडी होत आहे. या कार्यक्षेत्रातील रस्ते विकास यंत्रणांनी याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करावी. वारंवार खराब होणार्‍या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे. जेणेकरून वाहतूक विनाअडथळा वाहतूक कोंडीशिवाय सुरळीत सुरू राहील. आगामी दहा वर्षांत होणारे रस्ते तसेच या परिसरातून करण्यात येणार्‍या रस्त्यांचे नियोजन देखील सर्व रस्ते विकास यंत्रणांनी आत्तापासून करावे.

- Advertisement -

15 ऑक्टोबरपर्यंत टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण करणार : श्रीवास्तव

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझाची कामे विहीत वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच 15 ऑक्टोबरपर्यंत टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाही तर सदर टोल नाक्याचे कंत्राट रद्द करण्यात येईल, अशी माहिती यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक आणि ठाणेचे सचिव अन्शुमली श्रीवास्तव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -