राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. सकाळी कडक ऊन आणि संध्याकाळी जोरदार पाऊस पडत असल्याने सर्वसामन्यांनी वातावरण बदलाच्या त्रासाला समोरे जावे लागत आहे. मुंबईसह कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईसह उपनगर आणि कोकण भागात पाऊस सुरू आहे. विसर्जनानंतर कोकणात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. सिंधुदुर्गात तुफान पाऊस झाला. दरम्यान, अचानक सुरु झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शुक्रवारी दहा दिवसांच्या बाप्पला अखेरचा निरोप देण्यात आला. त्यानंतर आज कोकणात गेलेल्या चाकरमान्यांनी मुंबईची वाट धरली आहे. मात्र परतीच्या प्रवासावेळी जोरदार पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
पावसामुळे आणि पाणी साचल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. सतत पाऊस सुरू राहिल्यास जिल्हयात आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी भागात पावसाचा जोर कायम आहे.
पालघर मध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे . विजांच्या कडकडाटासह पालघरच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू. पहाटे पासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पालघर मध्ये पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. डहाणू, तलासरी, विक्रमगड परिसरात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 12 सप्टेंबरपासून राज्यात पावासाचा जोर वाढणार आहे. कोकणसह मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढणार असून, घाट भागातही मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा – सरकार पडेल या भीतीने दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार नाही; काँग्रेसचा आरोप