देशातल्या चार राज्यांच्या निवडणूका या देशाच्या राजकारणाच्या दिशा स्पष्ट करणाऱ्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ,आसाम,तामिळनाडू मध्ये विधानसभा निवडणूक सुरु आहेत. खास करुन पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये राजकारणाच्या दिशा स्पष्ट होतील. दाक्षिणात्य राज्यांमध्ये काय होईल याचा अंदाज लावता येणार नाही. परंतु आसाममध्ये भाजप सत्तेत असले तरी काँग्रेस पक्ष चांगला लढा देतो आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने संपूर्ण ताकद लावली असेल तरी टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी एकटी वाघिण पुरुन उरली आहे असे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे निवडणूकांनंतर राजकारण कोणत्या दिशेने जातंय, विरोधी पक्षांच्या नव्या आघाड्या स्थापन होऊन ते कोणती भूमिका घेतात हे स्पष्ट दिसेल असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोरोनाचे राजकारण करु नये – राऊत
लॉकडाऊन किंवा कोरोनाचे राजकारण कोणीही करु नये. राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री जे सांगत आहेत. ते जनतेच्या हिताचे आहे. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना पाठींबा देत मुख्यमंत्र्यांच्या हातात हात घालून महाराष्ट्रासाठी काम केले पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात लॉकडाऊन हा उपाय नाही आहे. यावर संजय राऊतांनी म्हटले आहे की, कोरोनावर लॉकडाऊन हा उपाय नसल्याचे आम्हालाही ठाऊक आहे. त्यात नवे काय आहे. पंतप्रधान मोदींनाही हे ठाऊक आहे. तरीही मोदींनी देशात १ वर्ष लॉकडाऊन केला होता. मोदींनीही प्रेमाने आणि आनंदाने लॉकडाऊन केला नव्हता आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आनंदाने लॉकडाऊन लावत नाही आहेत.