घरमुंबईमानवतावादी लेखक भगवतीचरण वर्मा

मानवतावादी लेखक भगवतीचरण वर्मा

Subscribe

भगवतीचरण वर्मा यांचा आज स्मृतिदिन. भगवतीचरण वर्मा हे आधुनिक हिंदी कादंबरीकार, कथाकार व कवी. त्यांचा जन्म 30 ऑगस्ट 1903 रोजी उत्तर प्रदेशातील उन्नाओ जिल्ह्यात शफीपूर या छोट्या खेड्यात झाला. जगमोहन विकसित यांच्या प्रेरणेने भगवतीचरण यांनी मैथिलीशरणांचे भारतभारती काव्य अभ्यासले व त्या प्रभावातून सातव्या इयत्तेत असल्यापासूनच ते स्वतः कविताही रचू लागले. बी. ए. (१९२६), एल एल.बी. (१९२८) झाल्यावर १९३५ पर्यंत त्यांनी वकिली केली. काही काळ ते भदरी संस्थानाधिपतींच्या दरबारी होते. पुढे त्यांनी कोलकात्यात विचार साप्ताहिकाचे संपादक म्हणून (१९४०-४२) तसेच मुंबईत चित्रपटसृष्टीत पटकथाकार म्हणून (१९४२-४७) काम केले. १९४८ ते १९५७ पर्यंत ते लखनौ येथील नवजीवन या दैनिकाचे संपादक होते. १९५० पासून त्यांची आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर हिंदी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. उत्तर प्रदेशातील ‘भारती’ या साहित्यिक संस्थेचे संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले.

वर्मांच्या साहित्यसेवेचा प्रारंभ कवितांनी झाला. ‘मधुकण’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘प्रेम-संगीत’ (१९३७) व ‘मानव’ (१९४०) हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कवितेवर प्रारंभी छायावादाचा प्रभाव असला तरी एका विशिष्ट वादाला धरून अशी त्यांची कविता पुढे राहिली नाही. मानवतावादी दृष्टिकोण त्यांच्या सर्व लेखनातून प्रकट होतो. कविता छंदोबद्ध असावी, असा त्यांचा आग्रह होता. एक प्रकारची बेहोषी, कलंदरपणा व स्वच्छंदतावादी वृत्ती हे विशेष त्यांच्या काव्यात आढळतात. ‘पतन’ ही त्यांची पहिली कादंबरी (१९२८). त्यानंतरची ‘चित्रलेखा’ (१९३३) ही त्यांची कादंबरी अत्यंत गाजली. ‘तीन वर्षं’ (१९३६) ही सामाजिक कादंबरी म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीने दिपून गेलेल्या तरुणाच्या व्यथेची कथा आहे. टेढे-मेढे रास्ते (१९४७) या राजकीय-सामाजिक पार्श्वभूमीवर आधारलेल्या कादंबरीत स्वातंत्र्यपूर्व काळातील विविध विचारसरणी (सामंतवाद, गांधीवाद, दहशतवाद, साम्यवाद, क्रांती इ.) व त्यांचे संघर्ष चित्रित केले आहेत.

- Advertisement -

‘भूले-बिसरे चित्र’ (१९५९) मध्ये देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील तीन पिढ्यांचे चित्रण आहे. ‘अपने खिलौने’ (१९५७) या कादंबरीत दिल्लीतील अत्याधुनिक समाजावर व्यंगात्मक औपरोधिक भाष्य आहे. एकांकिकाकार व नाटककार म्हणूनही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ‘बुझता दीपक’ (१९५०) हा एकांकिका-संग्रह ‘रुपया तुम्हे खा गया’ (१९५५) हे नाटक महाकाल, कर्ण व द्रौपदी या नमोनाट्यांचा एकत्रित संग्रह आहे. ‘इन्स्टॉलमेंट’ (१९३६), ‘दो बाँक’े (१९४१), ‘राख और चिनगारी’ (१९५३), ‘मोर्चाबंदी’ (१९७६) हे त्यांचे कथासंग्रह आहेत. त्यांच्या भूले बिसरे चित्र या कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९६१) लाभला. प्रेमचंदांच्या नंतर समाजातील स्थित्यंतरांचे साहित्याच्या माध्यमातून इतके प्रभावी व प्रत्ययकारी चित्रण भगवतीबाबूंनीच केले. उपरोधप्रचुर, व्यंग्यात्म चित्रण हे त्यांच्या शैलीचे बलस्थान होय. सूक्ष्म परिहासपूर्ण विनोद, सामाजिक राजकीय जीवनाचे वास्तव चित्रण, सूचक आदर्श ही वैशिष्ठ्ये वर्माजींच्या गद्य कृतींत दिसून येतात. अशा या महान लेखकाचे 5 ऑक्टोबर 1981 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -