नवी मुंबईला एमआयडीसीकडून होत असलेला पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने ग्राहकांकडून तक्रारी येत होत्या. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने तात्पुरते नियोजन करत मोरबेतून पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र अद्याप एमआयडीसीकडून पूर्ण क्षमतेने पाणी दिले जात नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी एमआयडीसीला पाणीपुरवठा सुरळीत करा, आशा सूचना बैठकीत दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पालिका, सिडको व एमआयडीसी या तिन्ही प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही सूचना दिली.
नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु शहरातील काही भागांत अद्याप एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शीळ परिसरात ३५ तर शहरातील गावठाण आणि झोपडपट्टी भागात ३० एमएलडी पाणीपुरवठा एमआयडीसीकडून करण्यात येतो. परंतु गेले काही दिवस पूर्ण आरक्षित पाणी या भागाला मिळत नाही. त्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांनी तात्पुरते नियोजन करत मोरबेतून या भागाला पाणी वळविले होते. मात्र यामुळे २४ तास पाणी मिळणार्या भागाला पाणीकपात करण्यात आली होती. ही पाणीकपात होत असल्याने या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. परिणामी सर्व शहरातील पाणी नियोजन बिघडले आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी सिडको, एमआयडीसी यांच्यासोबत बैठक घेतली. यात पालिकेने केलेले तात्पुरते नियोजन मागे घेत मोरबेचा पाणीपुरवठा पूर्वत करणार आहे. तर एमआयडीसीने त्यांच्या भागाला पाणीपुरवठा सुरळीत करावा, आशा सूचना दिल्या आहेत.
एमआयडीसीने आतापर्यंत या भागाला ५४ दिवसांत सरासरीपेक्षा कमी पाणीपुरवठा केल्याचे आयुक्तांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच हा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने नियोजन करावे, असे निर्देश दिले. महापालिका व सिडको यांच्यामार्फत दैनंदिन पाणीपुरवठयाची घेतली जाणारी नोंद एकाच वेळी घेतली जावी व त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्स अॅपद्वारे परस्परांशी संपर्क साधावा, असे सांगितले.