आमदार गणेश नाईक स्थानिक आमदार निधीअंतर्गत आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ९ जीवरक्षक रूग्णवाहिकांचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेला या रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. कोरोना व अन्य रूग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यास या रूग्णवाहिकांमुळे मदत मिळणार आहे. रूग्णवाहिका लोकार्पणाबरोबरच स्पर्धा परिक्षांसाठी पालिका ग्रंथालयांना पुस्तके व पालिकेच्या विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठांना विरंगुळा साहित्याचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले. यावेळी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार रमेश पाटील, आमदार नरेंद्र पाटील, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे सरकार करत असून राज्यात सोयीस्करपणे निवडणुका घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला. जिल्हा बँकेच्या आणि अन्य निवडणुका घेण्यात येत आहेत. मात्र ज्या ठिकाणी त्यांना पराभवाची भीती वाटते त्या ठिकाणी निवडणुका घेत नाहीत. नवी मुंबईमध्ये आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली जनतेची कामे होत असून विलंबाने जरी नवी मुंबई महापालिका निवडणूक घेतली. तरी सध्या असलेल्या जागापेक्षा जास्त जागा भाजपाला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Dedicated 9 Ambulances for Navi Mumbai Municipal Corporation healthcare facilities in Navi Mumbai this afternoon.
Former Minister Ganesh Naik ji, Mandatai Mhatre & others were present on this occasion. pic.twitter.com/Adu5Oo6NZ5— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 12, 2021
राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याकडे कानाडोळा करून दिल्लीत आंदोलन करणं म्हणजे काँग्रेसचा ढोंगीपणा असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने १२१ विघटना दुरुस्ती करून राज्यांना मागास प्रवर्ग ठरविण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु महाराष्ट्र सरकारलाच मराठा आरक्षण द्यायचे नाही. मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाला अद्याप एम्पिरिकल डेटा तयार करण्यासाठी सूचित करण्यात आलेले नाही. मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासाठी मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून दिलेला नाही. स्वतःच अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असत. केंद्र सरकारवर लसींच्या तुटवड्याचा आरोप होत असेल तर महाराष्ट्रामध्ये विक्रमी लसीकरण केल्याचा दावा महाविकास आघाडीचे सरकार कोणत्या आधारावर करते आहे? असा सवाल करून लससाठा उपलब्ध केल्या शिवाय विक्रमी लसीकरण झालं का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आमदार गणेश नाईक यांनी रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असे नमूद करून नवी मुंबईसाठी आणखी कार्डियाक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
लोकार्पण करण्यात आलेल्या आठ रूग्णवाहिका या नवी मुंबई महापालिकेच्या दिघा, रबाळे, खैरणे, पावणे,घणसोली, तुर्भे आणि जुहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असणार आहेत. आधुनिक जीवरक्षक प्रणाली असणारी रूग्णवाहिका पालिका रूग्णालयाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत असणार आहे. गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टची रूग्णवाहिका संपूर्ण नवी मुंबईत सेवेत उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा –
राज्यातील खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपातीचा शासन निर्णय जारी