नवी मुंबईत वॉर्ड आहेत एकशे अकरा ; काँग्रेस राष्ट्रवादीचा करायचा आहे बकरा ; आम्ही चालू देणार नाही शिवसेनेचा नखरा ; भाजप आरपीआय युतीच्या विजयासाठी गणेश नाईक आणि मी मारणार आहे नवी मुंबईच्या चकरा ! अशी कविता सादर करून नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित रिपाइंच्या `मी रिपब्लिकन` मेळाव्यात निवडणूक प्रचाराचे रणशिंग रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी फुंकले.
रविवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे रिपाइं चा नवी मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत रिपब्लिकन पक्ष युती करून किमान ८ जागांवर आपले उमेदवार उभे करील. भाजपला २५ जागांची यादी दिली असून त्यातील ८ जागा रिपाइंला सोडण्यात याव्यात असा प्रस्ताव भाजपला दिला असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
अनेकांनी झेंडा बदलला; पक्षाचे नाव बदलले मात्र आम्ही कधीही हाती घेतलला निळा झेंडा खाली ठेवणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष माझा रिपब्लिकन पक्ष म्हणून आम्ही कधीही रिपब्लिकन नाव बदलणार नाही. आम्ही अभिमानाने जगाला सांगत आहोत. आमची घोषणा आहे मी रिपब्लिकन ! माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. मंत्रिपदा पेक्षा कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला मोठा मानतो. मंत्रिपद असो कि नसो मी रिपब्लिकन पक्षाचा गाढा पुढे घेऊन जात आहे. जनता माझ्या सोबत आणि मी जनतेसोबत आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले.
नवी मुंबई प्रमाणे औरंगाबाद, वसई विरार, कल्याण डोंबिवली या महापालिका आणि पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकांसह अन्य १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा राहून युती करेल, असा विश्वास आम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिला असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. येत्या २५ फेब्रुवारी रोजी देशभर रिपाइं तर्फे भूमीमुक्ती आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात गरीब भूमिहिनांना ५ एकर जमीन कसण्यासाठी द्यावी ज्यामुळे शहरात येणारे लोंढे थंबतील तसेच दारिद्रय रेषेखालील गरिबांची वाढती संख्या कमी होईल असा दावा रामदास आठवले यांनी केला.