खारघर शहरातील सिडकोच्या सर्वात जुन्या असलेल्या घरकुल गृहनिर्माण प्रकल्पाची धोक्याची घंटा वाजली आहे. मागील २१ वर्षांपासून धोकादायक बनलेल्या घरकुल संकुलाला सिडकोने आरंभीच्या काळात डागडुजीचा टेकू लावला. मात्र, आतून कमजोर झालेले घरकुल संकुल कधीही जमीनदोस्त होऊ शकते. पनवेल महानगरपालिकेने घरकुल संकुलाला धोकादायक इमारत म्हणून केव्हाच घोषित केले आहे. सिडकोने केले इमारत चाचणीत ( स्ट्रक्चर ऑडिट ) घरकुल धोकादायक असल्याचे अगोदरच स्पष्ट झालेय. घरकुल कोसळले तर इथे हाहाकार माजेल. मात्र, तरीदेखील मागील २१ वर्षांपासून वास्तव्यास असलेले सदनिधारक झोपेत आहेत. पाया कमजोर व डळमळीत झालेल्या घरकुल गृहसंकुलात राहणाऱ्या सदनिधारकांना जाग केव्हा येईल, येथील रहिवाशी मृत्यूचे निमंत्रण येण्याची प्रतीक्षा करीत आहेत का, असा प्रश्न निर्माण झालाय.
महाराष्ट्र शासनाने मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबई शहर वसविले. नवी मुंबईचे नियोजन करून राज्य शासनाने सिडकोच्या माध्यमातून अनेक गृहनिर्माण प्रकल्प नवी मुंबईत आणले. सिडकोने २००० साली खारघर मध्ये घरकुल गृहप्रकल्प आणला. मे खत्री कंस्ट्रक्शनद्वारा हा प्रकल्प सिडकोने बांधून घेतला. अगदी सर्वसामान्यांसाठी असलेला हा प्रकल्प खारघर सेक्टर १५ मध्ये उभारला. ए, बी, सी, डी अशा चार विंग मध्ये विभागलेला तळमजला अधिक तीन मजल्याच्या इमारतीचा हा प्रकल्प आहे. एका विंगमध्ये साधारणतः २४ इमारती आहेत. घरकुल संकुलात सुमारे दीड हजार सदनिका आहेत. साधारणतः पाच ते सहा हजार लोकसंख्या असलेली हि वस्ती आहे. २००१ साली सदनिकाधारकांना घराचा ताबा सिडकोने दिला. मात्र, पहिल्याच वर्षात सिडकोच्या हा प्रकल्पाचा फज्जा उडाला. अगदी निकृष्ट आणि कमजोर बनविलेले घरकुल संकुल पहिल्याच पावसात गळायला लागले. पहिल्याच वर्षात भिंतींना गेलेले तडे, स्लॅबला पडलेल्या भेगा यामुळे घरांमध्ये पूर आला. आता राहायचं कसे असा प्रश्न नागरिकांना पडला होता. खत्री बिल्डरने बांधलेले निकृष्ट दर्जाचे घरकुल सिडकोने नागरिकांच्या गळ्यात मारले. राज्य शासन आणि सिडकोने घरकुलवासीयांची केलेली हि मोठी फसवणूक होती.
घरकुलमध्ये घरे घेणारे अगदी अल्प उत्पन्न आणि माध्यम उत्पन्न गटातील होते. कर्ज काढून, सोने विकून डोक्यावर कर्जाचा बोझा घेऊन लोकांनी इथे घरे घेतली होती. मात्र, राज्य शासन आणि सिडकोने लोकांची फसवणूक करून घोर निराशा केली. सिडकोने तातडीने घरकुलचे स्ट्रक्चर ऑडिट केले. तेव्हा घरकुल धोकादायक असल्याचा अधिकृत शिक्का बसला. मात्र, सिडकोने थोडीफार डागडुगी करून रंगरंगोटी केली. सिडकोने त्यांचे उघडे झालेले पितळ झाकले खरे, मात्र, लाखो रुपये कर्जाचा बोझा घेऊन इथे सदनिका घेऊन राहायला आलेल्या हजारॊ सदनिकाधारकांना मृत्यूच्या जाळ्यात अडकळविले. खरेतर, घरकुलची पुनर्बांधणी करून सदनिकारकांना हककाचे पक्के घर देण्याची जबाबदारी सिडकोची होती. मात्र, सिकडोने ती जबाबदारी झटकली. तब्ब्ल २१ वर्षे येथील रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पनवेल महानगरपालिकेने घरकुलला धोकादायक घोषित करून इमारती खाली करण्याचा फतवा काढला आहे. पण घरे खाली करून जाणार कुठे असा प्रश्न आहे.
मागील दोन वर्षात धोकादायक आणि निकृष्ट दर्जाच्या असलेल्या इमारती कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षी अशीच एक दुर्घटना मुब्र्यात घडली आणि संपूर्ण राज्य हदरले. मागच्या आठवड्यात मालाड येथे अशीच एक दुर्घटना घडली आणि हाहाकार मजला. धोकादायक इमारतीत राहून मृत्यूचे तांडव वाढत आहेत. घरकुल यापासून फार दूर आहे असे नाही. घरकुल संकुलाच्या भिंती भुसभुशीत झाल्या आहेत. इमारतींना गेलेल्या तड्यामधून इमारतीचे सडलेले , गंजलेले स्टील दिसत आहे. मात्र, येथील रहिवाशी प्लास्टरचा मुलामा लावून समाधान मानतात. वरून कितीही प्लास्टर लावलेतरी आतून निकृष्ट झालेल्या इमारतीचा बांधा मजबूत कसा होणार ? सिडको आणि पालिका प्रशासनाणे घरकुल धोकादायक असल्याचे जाहीर करून देखील अद्यापि नागरिक बिनधास्तपणे कसे राहतात, याबाबत आश्चर्य वाटत आहे.
घरकुल संकुल धोकादायक असल्याची फक्त नोटीस न काढता सिडको आणि पनवेल महानगपालिका प्रशासनाने पुढाककर घेणे गरजेचे आहे. घरकुल संकुलाचे बांधकाम अगोदरच निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. २१ वर्षात ते आणखी कमजोर झाले आहे. त्यामुळे घरकुल संकुल वेळीच खाली करून रहिवाशाचे स्थलांतर करणे गरजेचे आहे. घरकुल संकुल धोकादायक झाल्याने त्याची पुनर्बांधणी वेळीच नाही झालेतर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. शासन असो किव्हा प्रशासन , नागरिकांना घरी बसून न्याय मिळणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम घरकुलवासीयांनी एकत्र येऊन हा लढा उभा करावा लागेल.
हेही वाचा –
नद्या, नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी ट्रॅश बुम तराफ्याचा वापर; BMC चा निर्णय