नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे वारे वेगाने वाहू लागले असून सत्ताधारी आणि विरोधकांच्या आतापासून कुरखोडी सुरू झाल्या आहेत. दिघ्यातील रस्ता रुंदीकरणाच्या कामात विरोधकांनी नागरिकांची घरे तोडण्यात येणार असल्याची रीळ उठवली असल्याचा आरोप करत दिघ्यातील रस्ता रुंदीकरणाच्या कामात एकाही नागरिकाला शिवसेना बेघर होऊ देणार, अशी ग्वाही पालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी दिली. दिघा प्रभाग ४ मधील विष्णूनगर नाका ते रामजी आंबेडकर नगरपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम स्थगित करण्याच्या कामाला अभिजीत बांगर यांनी दिल्याचे चौगुले यांनी सांगितले.
रामजी आंबेडकर नगर कडे जाणारा ११ मीटर लांबीचा रस्ता वनखात्याकडून करारावर जमीन घेऊन पूर्ण करण्यात आले आहे. त्यामागील रस्त्याच्या कामामध्ये कोणत्याही घराला बाधित होऊ देणार नाही. अशा प्रकारचे नियोजन करून रस्ता रुंदीकरण करण्यात येईल.
– संजय देसाई, शहर अभियंता
प्रभाग-४ मधील नागरिकांच्या समस्यासाठी चौगुले यांच्या समवेत स्थायी समितीचे माजी सभापती नवीन गवते, माजी नगरसेविका अॅड. अपर्णा गवते व दीपा गवते, प्रभाग समितीचे माजी सदस्य चंद्राम सोनकांबळे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. याविषयी अधिक माहिती देताना माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी सांगितले की, दिघा विभागातील प्रभाग क्रमांक ४ विष्णूनगर नाका ते रामजी आंबेडकर नगरपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. हा अंतर्गत रस्ता असून रहिवासी ग्रामपंचायत कालावधीपासून येथे वास्तव्यास आहेत. येथे राहणार्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना नव्याने कुठे घर घेणे शक्य नाही. अनेक वर्षापासून नागरिक महापालिकेचे करदाते असल्याने पालिका येथील त्यांना सोयीसुविधा देत आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण करत असताना कोणत्याही घराला बाधा होता कामा नये. रस्त्याचे रुंदीकरण न करता रस्त्याच्या मधोमध मलनि:सारण वाहिन्या टाकून रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्याची मागणी करण्यात आल्याचे गवते यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून दिघा विभागातील नागरिकांची विकासकामे थांबवण्यात येत आहेत. दिघावासियांना आपली घरे तुटतील, अशी भीती विरोधकांकडून दाखवण्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून जनता आगामी कालावधीत योग्य निर्णय घेईल, असे गवते म्हणाले. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या रस्तारुंदी करण्याच्या कामाला स्थगिती दिल्याचे सांगितले.