नवी मुंबई-राज्यात मराठा समाज आरक्षण सुरू असताना आता धनगर समाजानेही आंदोलनाची ठिणगी टाकली आहे. सरकारने आश्वासन देऊनही एकाही मागणीची पुर्तता केली नाही.त्यामुळे समाज संतप्त झाला आहे. मराठा समाजाप्रमाणे युध्द पातळीवर धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आता लढाई सुरू केली आहे. त्याकरीता सकल धनगर समाज, नवी मुंबई शाखेतर्फे येत्या १० नोव्हेंबर (Dhangar samaj mahamorcha in belapur) रोजी दुपारी २ वाजता खारघर ते बेलापूर मार्गी कोकणभवनावर महामोर्चा काढून मेंढपाळ समुहाच्या उपस्थितीत कोकण आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
वाशी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत समन्वय समितीचे महादेव अर्जुन, भास्कर यमगर, मल्लिकार्जुन पुजारी, डॉ.सखाराम गारळे, रावसाहेब बुधे, प्रा.नारायण खर्जे, तुषार धायगुडे, उद्धव गावडे आदींसह उपस्थित होते.
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणासाठीचा लढा सुरूच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये नमुद केल्यानुसार समाजाला आरक्षण दिले असे असताना ’धनगड’ या चुकीच्या उल्लेखामुळे ’धनगर’ समाज गेली ६५ वर्ष आरक्षणापासून वंचित आहे.२०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबीनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्यावेळी दरवर्षी १००० कोटींचा जाहिर केला तर १३ जीआर निघाले. पण अद्याप त्यावर ठोस निर्णय पदरी पडलेला नाही.विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे उपोषणा दरम्यान सरकारने ५० दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ५० दिवस पुर्ण होत असताना देखील सरकारने तसूभरही पाऊल उचलले नाही.आता सरकार धनगर आरक्षणासाठी समिती नेमण्याच्या तयारीत आहे. याला समाजाने विरोध दर्शवला आहे. ही समिती म्हणजे वेळ काढूपणा आहे. त्यामुळे आता समिती नको, धनगर आरक्षण अंमलबजावणी करा, ही मागणी लावून धरली आहे. धनगर समाज आक्रमक झाला “ना पक्ष,ना नेता,ना संघटना” असा नारा देत हा महामोर्चा काढणार असल्याचे भास्कर यमगर म्हणाले.