नवी मुंबई-: शहरातील हवेची गुणवत्ता (Air quality in Navimumbai) घसरल्याने नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागत होते. प्रदूषण नियमानुसार पालिकेने न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यातच अचानक पावसाने हजेरी लावल्याने दोन दिवसात शहरातील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्याची माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यांनी दिली.
शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्सूआय प्रमाणे) नेरूळ ६७, महापे १०३ कोपरखैरणे ६० असा आढळून आला आहे.शुक्रवारच्या पावसामुळे हवेतील धुलीकण (धूळ) बर्याच प्रमाणामध्ये पुन्हा जमिनीवर स्थिरावली आहे.परिणामी हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण सुधार झाले आहे.
- आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने आणि शहर अभियंता संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागात नोडल ऑफिसर नियुक्त करून त्यांना अभियंता आणि अन्य कर्मचार्यांची मदत देण्यात आली. या पथकांनी शहरातील विविध बांधकाम व्यवसायिकांना बांधकामा संदर्भात हवेचा दर्जा घसरू नये यासाठी शासनाकडून नेमून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
- कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विकास प्रस्तावांतर्गतच्या बांधकाम ठिकाणी पहाणी करून तसेच सिमेंट काँक्रिट प्लॅण्ट, खडी केंद्र, डांबराचे प्लॅण्ट इत्यादी ठिकाणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निदेशांचे पालन होत आहे का? याची तपासणी सुरु केली आहे.या आदेशाचे पालन न करणार्या विकासकांस नोटीस देणे इत्यादी वैधानिक कार्यवाही चालू करण्यात आली आहे. या प्रकरणी ३० हून अधिक बिल्डरांना नोटीसा देण्यात आल्या असून त्यातील काही जणांकडून साडेसहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- वरिष्ठ स्तरावर याची काटेकोर अंमलबजावणी चालू झाल्याने बांधकाम साहित्य वाहून नेणारे डंपर पूर्णपणे ताडपत्रीने झाकण्यात आले होते.शहरांतर्गत तसेच अन्य कुठल्याही शहरातील डेब्रिज वाहतुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. यासाठी २४ तास डेब्रिज भरारी पथक कार्यरत होते.शहरात सध्या सुरू असलेली बांधकामे ज्यामध्ये उत्खनण करण्याचे काम आहेत ती पुर्णपणे थांबवण्यात आले आहेत, अशी माहिती संजय देसाई यांनी दिली.