लवकरच शारदीय नवरात्र सुरु होणार आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवीची पूजा-आराधनेसोबतच उपवास देखील केला जातो. या काळात काहीजण निर्जळी उपवास करतात तर काही खाऊन पिऊन उपवास करतात. उपवास करताना नेमकं काय खायचे असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उपवासात खाल्ल्या जाणाऱ्या याच पदार्थांबद्दल सांगणार आहोत.
वरई
उपवासाला भात खाल्ला जात नाही त्यामुळे भाताला पर्याय म्हणून वरईचा खाऊ शकता. वरईची चव ही ब्राऊन राईससारखी असते. वरईमुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यात बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, फायबर आणि मॅग्नेशियम असतात. वरईचा डोसा तुम्ही उपवासाला खाऊ शकता.
रताळी आणि बटाटा
नवरात्रात रताळे आणि बटाटे खाणे कधीही उत्तम समजले जाते. उकडलेली रताळी किंवा बटाट्यापासून तुम्ही वेगवेगळे उपवासाचे पदार्थ तयार करु शकता. रताळ्याचे शेंगदाणे घालून कटलेट किंवा थालिपीठ देखील उपवासाला खाऊ शकता.
सुका मेवा
उपवासाच्या नऊ दिवसात आपली एनर्जी वाचवण्यासाठी सुका मेवा खा. सुक्या मेव्यापासून तयार करण्यात आलेले लाडू, खजूर रोल किंवा शेंगदाण्याचे लाडू उपवासाला खाऊ शकता.
ताक, सरबत
ऑक्टोबर महिन्यात वातावरणातील उष्णता वाढते. अशावेळी आपल्या शरिरीत पाणी जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपवासाच्या दिवसात एनर्जी टिकवण्याठी ताक, सरबत,सोलकडी किंवा शहाळे हे पेय तुम्ही पिऊ शकता.
नारळाचे पदार्थ
उपवासाला नारळ खाल्ला जातो. मग नुसतेच नारळाचे खोबरे खाण्याऐवजी नारळाच्या वड्या, नारळाची चटणी किंवा उपवासाच्या एखाद्या भाजीत देखील नाराळाचा चव घालून खाऊ शकता.
पापड
उपवासाला साबुदाण्याचे पापड किंवा रताळ्याचे पापड खाऊ शकतो. त्याचप्रमाणे केळी किंवा बटाट्याचे वेफर्स मात्र हे पदार्थ शक्यतो घरच्या घरी तयार केलेले असल्यास उत्तम. बाहेरच्या तळलेल्या पदार्थांमुळे अॅसिडिटी होऊ शकते.
फळे
नवरात्रीच्या नऊ दिवसात एका दिवसात किमान ३-४ फळे खावीत. पोट देखील भरलेले राहते. फळांमधून योग्य पोषक देखील आपल्या शरीरात जातात.
राजगिरा
उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी हा प्रकार येतोच. मात्र बऱ्याच जणांना साबुदाणा आवडत नाही. त्यांच्यासाठी राजगिऱ्याच्या पिठाची पुरी किंवा थालीपिठ करुन घाऊ शकता. राजगिऱ्याच्या पिठाने पोटही भरते आणि आवश्यक पोषक घटक देखील शरीरात जातात.