लासलगाव : अरबी समुद्रात घोंघावणार्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून निफाड तालुक्यात ढगाळ हवामान आणि जोरदार वारा वाहत आहे. कधी ढगाळ हवामान तर कडक ऊन असा निसर्गाचा खेळ सुरू आहे. दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग शेतातील कांदा भिजू नये म्हणून कांदा चाळीत साठवणूक करताना दिसत आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने शेतकर्यांना शेतमाल विक्रीस अडचण येत आहे तर या वादळामुळे पावसाची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग कांदा चाळीत साठवण्यांसाठी धावपळ करत आहे. या वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग खबरदारी म्हणून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, ज्या शेतकर्यांकडे साठवणूक व्यवस्था नाही, त्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत.