श्रीरामपूर तालुक्यातील पढेगावाजवळ असणार्या कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चैतन्य अनिल माळी (वय १२), दत्ता अनिल माळी (वय ८),चैतन्य शाम बर्डे (वय ४) असे शेतळ्यात बुडून मृत्यू पावलेल्या लहान मुलांची नावे आहेत. याबाबत श्रीरामपूर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, कान्हेगाव येथे सकाळी काही लहान मुले तलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी गेले होते. त्यातील चैतन्य अनिल माळी (वय १२), दत्ता अनिल माळी (वय ८),चैतन्य शाम बर्डे (वय ४) ही तीन लहान मुले खेळता खेळता कान्हेगाव येथील शेतकर्यांच्या शेततळ्याजवळ गेली. पावसाचे पाणी तळ्यामध्ये साचलेले होते, त्यामुळे पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही व हे तीनही मुले पाण्यात बुडून मयत झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी गोळा झाले. तिन्ही मुलांचे शव बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मृत पावलेली तिन्ही लहान मुले गरीब कुटुंबातील आहेत.