राहाता : महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीवर भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सडकून टिका केली. महाविकास आघाडीचा भ्रष्टाचाराचा किमान समान कार्यक्रम असून राज्यातील कोणत्याही घटकाला यांना न्याय देता आला नाही असे विखे-पाटील म्हणाले.
एसटी कर्मचार्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. परिवहन मंत्री रोज बोलताय त्याला कोणताच आधार नाही. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कामगारांच्या बाजूने भूमिका घेतली असती. मात्र, राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना अनिल देशमुख यांची पाठराखण करायला वेळ आहे. पण एसटी कर्मचार्यांसाठी त्यांना वेळ मिळत नाही, अशी टिका विखे-पाटलांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
सरकार तुमचे आणि आरोप भाजपवर या चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टिका विखे-पाटील यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांवर केली. एसटी कर्मचार्यांचा संप भाजप पेटवतय अस थोरात म्हणाले होते. त्याचा समाचार घेत विखे-पाटलांनी थोरांतावर निशाना साधलाय. भाजपवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही आझाद मैदानावर का गेला नाहीत. तुम्ही स्वतःला काँग्रेसी नेता समजतात ना? मग बैठक बोलवा आणि निर्णय घ्या, असा सल्ला विखे पाटलांनी महसूलमंत्री थोरातांना दिलाय.
बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका करताना, हे लोक आज स्वावतंत्र्यावर बोलत आहेत उद्या संविधानावर बोलतील असे वक्तव्य केले होते. थोरात यांच्या या वक्तव्याचा विखे-पाटलांनी समाचार घेतला आहे. थोरातांना अजून संविधानाच समजले नाही, ते वाळूच्या रेती आणि जमिनीच्या भानगडी बाहेर यायला तयार नाहीत. भाजपवर टीका करण्याआगोदर थोरातांनी आगोदर स्वतःच्या घरात झाकून पाहावं. संविधान समजून घेण्यासाठी आणि महात्मा गांधींच्या चष्म्यातून बघण्यासाठी त्यांना अजून बराच काळ लागेल असा टोला विखे-पाटलांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांना मुंबईत केबल कनेक्शन दिल्यासारखे एसटीचे काम सोप वाटत का? परब यांनी कधी एसटीमध्ये प्रवास केलाय का? कर्मचार्यांच्या आत्महत्या, कुटुंबाचा आक्रोश पाहिल्यावर मंत्र्यांच्या आरत्या ओवाळयाच्या का आम्ही? सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याच मी समर्थन करतो असे विखे-पाटील म्हणाले. वसुलीचा कार्यक्रम म्हणजेच सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे. रोज मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. सरकार पाडण्याचा आम्ही कोणताही प्रत्यन करणार नाही मात्र हे सरकार लोकांच्या केलेल्या फसवणुकीमुळे पडेल, असे प्रतिपादन विखे-पाटलांनी केले आहे.
केंद्राने कृषी कायदे मागे घेतल्यावर आता राज्य सरकार त्यांचे कायदे मागे घेणार असे समजते. तुमचे कायदे केंद्रापेक्षा सक्षम होते तर मागे का घेताय? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी कायदे आणले होते का? तुम्ही जर राज्याचे कायदे मागे घेणार असाल तर आघाडी सरकारने आधी राज्याची माफी मागावी, अशी मागणी विखे-पाटलांनी केली आहे.