घारगाव : विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून एक शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी (२९ मे) सायंकाळी हिवरगाव पठार गावच्या शिवारात घडली. या महिलेच्या चार शेळ्याही यामध्ये ठार झाल्या आहे. अनिता उर्फ मुक्ताबाई संजय वणवे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
साकुर परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण व विजेच्या कडकडाटसह सायंकाळी वादळी पाऊस पडला. वणवे घरापासून काही अंतरावर शेतात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. पाऊस सुरू होण्याआधी अचानक विजेचा कडकडाट झाला. याचवेळी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळाने पाऊस सुरू झाला.
घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, आदिनाथ गांधले, गणेश तळपाडे, सरपंच सुप्रिया मिसाळ, उपसरपंच दत्तात्रय वणवे, ग्रामसेवक विजय आहेर आदींनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.