घरपालघर२५ टनाचे दोन कचरा प्रकल्प बनविण्यासाठी शासनाकडून २० कोटी मंजूर

२५ टनाचे दोन कचरा प्रकल्प बनविण्यासाठी शासनाकडून २० कोटी मंजूर

Subscribe

तसेच हे प्रकल्प सुरू केल्यामुळे महापालिकेची वाहतूक खर्चावरील तीन कोटींची बचत होणार आहे.

भाईंदर :- शहरातील दैनंदिन कचरा संकलन ही भेडसावणारी समस्या दररोज एक मोठे संकट बनत असताना त्यावर उपाय म्हणून शासनाकडून त्यावर तोडगा काढण्यात येत आहे. शहरातच कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरात दोन ठिकाणी कचरा हस्तांतरण प्रकल्प बनविण्यासाठी स्वच्छ भारत अभिमान २.० अंतर्गत २० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधून दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत. कचरा वाहतूक करण्यासाठी वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे. या वाहतुकीवरील खर्च कमी करण्यासाठी तसेच रस्त्याने कचरा वाहतूक करत असताना निर्माण होणार्‍या समस्या कमी करण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. तसेच हे प्रकल्प सुरू केल्यामुळे महापालिकेची वाहतूक खर्चावरील तीन कोटींची बचत होणार आहे.

मीरा -भाईंदर महापालिका शहरातील दैनंदिन निघणारा कचरा हा भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातो. या कचर्‍यामुळे डम्पिंग ग्राउंडजवळील रहिवाशांना अनेक समस्या निर्माण होत आहेत. या उद्भवणार्‍या समस्या कमी करण्यासाठी महापालिका वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. महापालिकेने शहरात बायोमायनिंग प्रकल्प सुरू केले आहेत. कचर्‍यापासून वीजनिर्मिती व बायोगॅस प्रकल्प देखील सुरू केले आहेत. यामुळे डम्पिंग ग्राउंड येथे टाकण्यात येणारा कचरा कमी झाला आहे. त्यामध्ये आणखी कचरा कमी करण्यासाठी व कचरा वाहतुकीवरील खर्च कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी कचरा हस्तांतरण प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कचरा हस्तांतरण प्रकल शहरात दोन ठिकाणी उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी शासनाने स्वच्छ भारत मिशन ०.२ अंतर्गत २० कोटीचा निधी मंजूर केला आहे. यातून दोन ठिकाणी २५ टनाचे दोन मशीन बसवले जाणार आहेत.

- Advertisement -

या मशीन बसवण्यासाठी किमान १ एकर जागा आवश्यक आहे. या मशीन बसवल्यानंतर तेथे छोट्या गाड्यातून कचरा आणला जाईल. त्या मशीनमध्ये कचरा बारीक करून मोठ्या गाड्यामधून डम्पिंग ग्राउंडमध्ये नेला जाणार आहे. सध्या कचरा वाहतुकीसाठी २५० गाड्या वापरल्या जात आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर कचरा वाहतूक करण्यासाठी कमी गाड्या लागणार आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी येणारा खर्च देखील कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे जवळपास तीन कोटींची बचत होणार आहे. हे प्रकल्प पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरू करण्यात आले आहेत. लवकरच मीरा- भाईंदर शहरात देखील या प्रकल्पाला सुरुवात करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया,

- Advertisement -

मीरा -भाईंदर शहरात प्रकल्प सुरू करण्यासाठी जागा निश्चित करून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. लवकरच जागा निश्चित करून मशीन खरेदी करण्यार येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून २० कोटी निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेची कचरा वाहतूक खर्चात बचत होणार आहे. तसेच नागरिकांना कचर्‍यापासून होणार्‍या समस्येतून दिलासा मिळणार आहे.

– रवी पवार ,उप आयुक्त , मीरा – भाईंदर महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -