वसईः पालघऱ जिल्हयात महावितरणची वीज बिलापोटी तब्बल ४९ कोटी ४८ लाख रुपये थकबाकी झाली आहे. थकीत ग्राहकांनी वीज बिल त्वरीत भरणा केले नाही तर वीज पुरवठा खंडीत केला जाईल, असा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे. महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीज बिलापोटी १२७ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यातील पालघर जिल्ह्यात ४९ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील १ लाख २६ हजार ७०५ ग्राहकांकडे २० कोटी ६३ लाख तर पालघर मंडलातील ६९ हजार ८९८ ग्राहकांकडे २८ कोटी ८५ लाख रुपयांची वीज बिल थकबाकी आहे.
आर्थिक वर्ष संपत असल्याने महावितरणकडून थकीत वीज बिल वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. ग्राहकांनी थकीत वीज बिल त्वरीत भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल, असा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे. वीज बिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरकडून करण्यात आले आहे.