वसईः विरारजवळील चिखलडोंगरी गावात जात पंचायतीच्या पंचांनी ६ जणांना बहिष्कृत करून वाळीत टाकून त्यांना २५ हजारांचा दंड ठोठावला होता. याप्रकरणी त्रस्त झालेल्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्नाळा पोलिसांनी सोळा जणांविरोधात जात पंचायती विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२० (ब) पूर्वनियोजीत कटकारस्थान, कलम ५०३, आणि कलम ३४ एकच उद्देशाने गुन्हा करणे, कलम ३८९ दहशत निर्माण करणे भिती दाखवणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. विरार पश्चिमेला असलेल्या चिखलडोंगरी गावात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. या गावातील २०-२५ जण जातपंचायत चालवत आहेत. जात पंचायतीच्याविरोधात जाणार्यांना २५ हजार ते १ लाखांपर्यंतचा दंड आकारला जातो. मुरबाड तालुक्यातील सासणे येथे असलेल्या दत्ता देवस्थान वारकरी मंडळ ट्रस्टबरोबर गावातील पंचायतीचा वाद आहे. त्यामुळे चिखलडोंगरी ग्रामस्थांना सासणेला जायला बंदी आहे. मात्र, गावातील दिपा वैती (४०) या सेवा करण्यासाठी सासणे गुरूपीठात गेल्याने मागीलवर्षी त्यांना बहिष्कृत करून वाळीत टाकण्यात आले होते. तसेच २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. तसेच तिच्याशी संबंध ठेवण्यास कुटुंबियांना आणि नातेवाईकांना मनाई करण्यात आली होती.
गोकुळाष्टमीला दिपा वैतीची तब्येत बिघडल्याने तिचे मोठे भाऊ उमेश वैती (५०) सासणे येथे तिला भेटायला गेल्याने वैती यांना दंड आकारून पुन्हा वाळीत टाकण्यात आले. दंड न भरल्याने गावात मंदिरात जायला बंदी घातला बंदी घालण्यात आली. नळजोडणी बंद करून पाणी देणेही बंद केले गेले. उमेश वैती यांचा रिक्षाचा व्यवसाय असून त्यांच्या रिक्षातून प्रवास करण्यावरही बंदी घालण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे वैती यांनी जातपंचायतीने ठोठावलेला एक लाखाहून अधिकचा दंड भरला आहे. तसेच अद्याप एक लाख रुपये दंडाची रक्कम बाकी होती. जातपंचायत पंच दमदाटी करत असल्याने उमेश वैती गाव सोडून दुसरीकडे रहावयास गेले आहेत. काही दिवसांपूर्वी दत्तजयंतीला दर्शनासाठी सासणे येथे गेलेल्या दर्शन रामचंद्र मेहेर, (४८) रुचिता मेहेर (२१) कवेश लक्ष्मण राऊत यांनाही २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जात पंचायतीची दहशत आणि गुंडगिरी वाढत चालल्याने उमेश वैती यांच्यासह ५ गावकर्यांनी जात पंचायतीच्या ३२ जणांविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. जात पंचायतीचे लोक गुंडगिरी करून आर्थिक शोषण करत आहेत आणि सामाजिक अधिकार नाकारून जगण्याचा हक्क काढून घेतला असल्याची त्यांची तक्रार होती. याप्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर अर्नाळा पोलीस ठाण्यात धनेश मेहेर, घनश्याम तांडेल, कौशल्या केशव राऊत, किरण भास्कर मेहेर, हितेश रामचंद्र मेहेर, भारत नारायण पाटील, राजेश रामचंद्र मेहेर, जगदीश काशिनाथ म्हात्रे, मनिष काशिनाथ म्हात्रे, किशोर नारायण पाटील, ईश्वर बबन वैती, प्रभाकर हरिश्चंद्र मेहेर, विशाल जगन्नाथ वैती, प्रकाश मेहेर, किरण नारायण मेहेर, मोतीराम दामोदर वैती यांच्यासह जात पंचायती कमिटीतील इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.