त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेनंतर मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे धार्मिक भावना भडकावून दंगल घडवण्यात आली असून त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच दंगलीमागील सूत्रधारांना अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचा जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. याचा भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा अध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली निषेध जाहीर करून वसई तहसील महोदया यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत झाली पाहिजे. ही दंगल घडवणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे. दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे. स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी. भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते शेखर धुरी, महिला अध्यक्षा प्रज्ञा पाटील, उपाध्यक्ष मनोज बारोट यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.