वसईः मालमत्ता करापोटी जमा करण्यात आलेल्या रकमेत ४६ लाख रुपयांच्या हेराफेरीत सहाय्यक आयुक्त आणि रोखपाल यांचाही सहभाग असताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे. हा घोटाळा उजेडात आल्यानंतर महापालिकेने आता सर्वच प्रभाग समितीमधील व्यवहाराची चौकशी करण्यासाठी पाच जणांची समिती गठीत केली आहे.
वसई- विरार महापालिकेच्या प्रभाग समिती सी कार्यालयाच्या अंतर्गत मालमत्ता करापोटी जमा झालेल्या रकमेपोटी ४६ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत न भरता अपहार केल्याचा प्रकार चरण भट यांनी केलेल्या तक्रारीनंतर उजेडात आला. चौकशीनंतर महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी अधिक्षक अरुण जानी यांना निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणी जानी यांच्यासह सहाय्यक आयुक्त गणेश पाटील आणि रोखपाल नियती कुडू यांची विभागीय चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत तथ्य आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. चरण भट यांनी तक्रार केल्यानंतर अरुण जानी यांनी ४६ लाख रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा केली असली तरी जमा झालेली रक्कम त्याचदिवशी का जमा केली गेली नाही याचा तपास आता समिती करत आहे.
दरम्यान, याप्रकरणात सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना प्रशासन वाचवत आहे. घोटाळा एका महिन्यातील नसून गेले अनेक महिने सुरू आहे. अरुण जानी, रोखपाल नियती कुडू आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील हे त्रिकुट संगनमताने हा अपहार करत होते. नागरिकांची रक्कम बँकेत जमा न करता केवळ कागदोपत्री पैसे जमा झाल्याची नोंद दाखवली जायची. अशा प्रकारे किमान 2 कोटी रुपयांच्या पैशांचा अपहार झाल्या आरोप चरण भट यांनी केला आहे. याप्रकरणी नियती कुडू आणि गणेश पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याची गरज आहे. तसेच हा आर्थिक घोटाळा असल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
०००
हा घोटाळा उजेडात आल्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने महापालिकेतील सर्वच्या सर्व नऊ प्रभागातील कर वसुलीच्या व्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली असून लेखाधिकारी मिलिंद पाटील हे प्रमुख असून वरिष्ठ लेखापाल भूषण वाघ, किरण पाटील, वृषाली नाईक आणि रुपाली जोशी यांचा समावेश आहे. ही समिती सर्व प्रभागातील कर वसुलीचे व्यवहार तपासून अहवाल सादर करणार आहेत.