हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आल्याने पालघर जिल्ह्यातील तलासरी, विक्रमगड व डहाणू या तीन तालुक्यात सामुदायिक औषधोपचार मोहिम हाती घेण्यात आली आहे. २५ मे ते ५ जून दरम्यान ही मोहिम राबवली जाणार असून यावेळी हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी डीईसी आणि अल्बेडॅझॉल गोळ्या देण्यात येणार असल्याची माहिती पालघर जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी दिली. एकदा हत्तीरोग बळावल्यास उपाय नाही. मात्र, हत्तीरोग होवू नये, म्हणून डीईसी व अल्बेडॅझॉल गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा अशी सलग ५ वर्षे घेतल्यास हत्तीरोग होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या गोळ्या सेवन केल्याने हत्तीरोगाचा प्रसार होणे बंद होईल. पर्यायाने आपण स्वतः व भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त होऊ, असेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेचे नियोजन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे डॉ. सागर पाटील यांनी सांगितले. तसेच ही मोहीम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमे अतिशय महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन डॉ. सागर पाटील यांनी यावेळी सांगितले.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१९ इतके हत्तीरोगाचे रुग्ण आहेत. वसईमध्ये २६७, पालघरमध्ये १९३, डहाणूमध्ये १३०, तलासरी ७, जव्हारमध्ये ४, मोखाड्यात २, विक्रमगडमध्ये ६ तर वाडा तालुक्यात १० अशी रुग्णसंख्या आहे. डहाणू, विक्रमगड आणि तलासरी या तीन तालुक्यांची लोकसंख्या ८ लाख ४९ हजार ९८४ इतकी असून गर्भवती महिला, अति गंभीर रुग्ण, दोन वर्षाखालील बालके वगळता ७ लाख २२ हजार ५०० इतके लाभार्थी या मोहिमेसाठी पात्र आहेत. सहा दिवस प्रत्येक घरी जाऊन कर्मचारी हत्तीरोग विरोधी औषधे प्रत्यक्ष देणार असल्याची माहितीही डॉ. सागर पाटील यांनी दिली.
हेही वाचा –
राज ठाकरेंची पुढच्या आठवड्यात पुण्यात सभा, उद्या 12 वाजता करणार घोषणा