वसईः गणेशोत्सवाकरता कोकणात जाणार्या प्रवाशांची दरवर्षी होणारी लूट थांबवण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसाठीचे दर आधीच निश्चित करावेत, अशा मागणी वसई भाजपचे पदाधिकारी तसनीफ नूर शेख यांनी विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे केली आहे. विरार, नालासोपारा व वसई परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. यातील बहुतांश लोक हे कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील आहेत. या परिसरात कोकणातून आलेल्या व मुंबईतून विस्थापित झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. या सर्वांची मातीशी नाळ जुळलेली असल्याने गणेशोत्सव, होळी, महाशिवरात्र व एप्रिल-मे महिन्यात त्यांचे आपल्या मूळगावी येणे-जाणे असते. मात्र गावी जायचे झाल्यास या सर्वांना रेल्वे अथवा खासगी बस व एसटी यांचाच पर्याय आहे. एसटीचा गोंधळाचा कारभार आणि नसलेली अन्य वाहतूक व्यवस्था यामुळे एसटीने जाणे कोकणवासीयांना शक्य होत नाही. त्याचवेळी रेल्वेनेही जाणे शक्य होत नाही.
अशावेळी कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवासाठी विरार येथून सुटणार्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसने कोकणात ये-जा करण्याचा मार्ग निवडतात. मात्र कोकणवासीयांच्या भावनिक अडचणीचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या चाकरमान्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक लूटमार करतात. खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांत कुठेच एकवाक्यता नसते. परिवहन विभागाशी संगनमत करून खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची करत असलेली ही लूटमार थांबवावी, अशी मागणी वसई भाजप पदाधिकारी तसनीफ नूर शेख यांनी केली आहे. पुढील महिन्यात गणेशोत्सव असल्याने चाकरमान्यांनी आतापासूनच आगाऊ बुकिंग करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र वाढलेले डिझेल दर, नादुरुस्त रस्ते, आणि पोलीस व आरटीओला द्यावे लागणारे हफ्ते ही नेहमीची कारणे देत ट्रॅव्हल्स कंपन्या या वर्षीही बस भाडे वाढवण्याची शक्यता आहेत. राज्य सरकारच्या २०१८ च्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे भाडे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात येते. सदर भाडेदर विचारांत घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे संपूर्ण बससाठी प्रति किमी भाडेदर त्याच स्वरूपाच्या महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणार्या प्रति किमी भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा राहणार नाही, असा कमाल भाडेदर निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय क्रमांक-एमव्हीआर-0412/प्र.क्र.378(पु. बा.07)/परि-2. विचारांत घेऊन विरार उपप्रादेशिक विभागाने या संबंधीची दरनिश्चिती व जनजागृती करणारे फलक खासगी ट्रॅव्हल्सच्या बुकिंग कार्यालयांजवळ लावावेत, अशी आग्रही मागणी शेख यांनी केली आहे.