भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरात समाज भवने मोठ्या प्रमाणात बांधण्याचे प्रकार सुरू असून त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप हे एकमेकांवर फैरी झाडत आहेत. एकीकडे या समाज मंदिरांचा वापर निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी करीत असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता हे करत आहेत. त्यासोबतच शूरवीर महाराणा प्रताप यांचे भवन फक्त ६०० चौ. फुटात बांधून त्याचा अपमान करण्याचे काम केल्याचा घणाघाती आरोप मेहता यांनी सरनाईक व पालिका प्रशासनावर केला आहे. तर दुसरीकडे स्वतःच्या अपना घर गृहसंकुल प्रकल्पातील सुविधा भूखंड हातून जाण्याच्या भीतीनेच ते असे आरोप करीत असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
मेहता आरोप करताना म्हणत आहेत की, ६०० फुटांचे महाराणा प्रताप भवन बांधण्यासाठी पालिकेकडून १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यात शासनाचा एक कोटी आणि २५ लाख सरनाईक यांचा निधी असून त्यात काय चांदीच्या भिंती बांधण्यासाठी एवढे पैसे पालिका देत आहे. नेमके यात कोणाची हिस्सेदारी आहे.तसेच कोण टक्केवारी खात आहे. याचा खुलासा करावा तसेच ६०० चौ. फूट बांधकाम हे मार्केट रेडी रेकरनरनुसार कमी असतानाही त्याला अवाच्या सव्वा वाढवून भ्रष्टाचार करीत असल्याचा मेहता यांनी केला आहे. ह्याच पद्धतीने कमिशन खोरीच्या नादात मैथिली समाज भवन, हिंदी भाषा भवन, मराठा समाज भवन, वारकरी समाज भवन, बंगाली समाज भवन पण ६०० ते ५००० चौ. फुटांचे आहेत,असे मेहता यांचे म्हणणे आहे.
तर या आरोपांचे प्रतिउत्तर देताना सरनाईक यांनी सांगितले की, टेंडर काढण्याचे काम महापालिकेचे आहे. तसेच कुठल्या भवन वर किती खर्च येतो हे त्यांचे काम आहे. परंतु मेहतांच्या पोटात दुखत आहे. कारण जनतेच्या हितासाठी असलेला सुविधा भूखंड अजूनपर्यंत त्यांनी हस्तांतरण केलेला नाही . तसेच त्या सुविधा भूखंडापर्यंत जाण्यासाठी रस्ता पण दिला नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्हाला जनतेला उत्तर द्यावे लागते. जनतेचा सुविधा भूखंड जनतेला हस्तांतरित करावा आणि त्याच बरोबर सरनाईक यांनी सांगितले.मी मतांकरिता राजकारण केले असते, तर तीन वेळा निवडून आलोच नसतो,असेही सरनाईक म्हणाले.