घरपालघरबोईसरची कचराभूमी खैरापाडा, काहीतरी उपाय काढा

बोईसरची कचराभूमी खैरापाडा, काहीतरी उपाय काढा

Subscribe

खैरापाडा ग्रामपंचायतीकडे रोजच्या जमा होणार्‍या कचर्‍याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्याने खेळाच्या मैदानाच्या बाजूलाच कचरा फेकला जात आहे.

बोईसर : बोईसर जवळील खैरापाडा कचराभूमीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.या कचराभूमीला लावलेली आग सतत धुमसत असल्याने त्यातून हवेत पसरणार्‍या विषारी धुराने परिसरातील नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे.
खैरापाडा ग्रामपंचायत हद्दीत जमा होणारा रोजचा कचरा बोईसर पालघर मुख्य रस्त्यानजीक खैरापाडा मैदानाच्या एका बाजूला आणून फेकला जातो. ग्रामपंचायतीकडून ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण न करताच हा कचरा या ठिकाणी आणून टाकला जात असल्याने या जागेवर कचर्‍याचे मोठे ढीग तयार झाले आहेत.खैरापाडा ग्रामपंचायतीकडे रोजच्या जमा होणार्‍या कचर्‍याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्याने खेळाच्या मैदानाच्या बाजूलाच कचरा फेकला जात आहे.

या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला अज्ञात लोकांकडून आग लावली जात असून ही आग सातत्याने धुमसत असल्याने या पासून घातक विषारी स्वरूपाचा धूर निर्माण होऊन त्याचा बोईसर पालघर रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक व प्रवासी,मैदानात क्रिकेट खेळणारे खेळाडू आणि जवळच असलेल्या यशवंत सृष्टी या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पात राहणार्‍या हजारो रहिवाशांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे.कुजलेल्या कचर्‍यामुळे दुर्गंधी निर्माण झाल्यामुळे तसेच धुरामुळे या जागेवरून नाक मुठीत धरून जावे लागते.त्याचप्रमाणे सतत धुमसत असलेल्या कचर्‍यातून हवेत पसरणार्‍या धुराने नागरिकांना श्वास घ्यायला त्रास,डोळे लाल होऊन चुरचुरणे,त्वचा विकार सारखे विकार जडत आहेत.याचा सर्वात जास्त त्रास हा वृद्ध आणि लहान मुलांना होत आहे.मैदानाजवळ असलेली ही कचराभूमी गावाच्या बाहेर हलविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

- Advertisement -

 

बोईसर परिसरातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत रोजच्या जमा होणार्‍या कचर्‍याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याकरिता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवून प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना निर्देश दिले होते.त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित विभागांची यासंदर्भात तातडीने आढावा बैठक घेऊन आवश्यक जागेचा शोध सुरू करण्यात आला होता.मात्र एमआयडीसी बाजूच्या गावातील नागरिकांनी त्यांच्या परिसरात घनकचरा प्रकल्प राबविण्यास विरोध केल्याने हा प्रकल्प पुन्हा बारगळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -