वसईः जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे वसई- विरार शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. पुढच्या महिन्यात गणेशाचे आगमन होत असल्याने त्यापूर्वी वसईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा सिंग यांनी केली आहे. रेंज ऑफिस ते सातिवली, एव्हरशाईन गेट ते वसई फाटा, नालासोपारा स्टेशन ते नालासोपारा फाटा तसेच नालासोपारा, विरार, वसई व नायगाव येथील गावागावांतील अंतर्गत रस्ते अशा अनेक रस्त्यांवर या पावसाळ्यात मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे प्रवाशांना आणि वसई -विरार शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी छोटे- मोठे अपघात होत आहेत. गरोदर स्त्रिया, वरिष्ठ नागरिक, रुग्ण यांना या रस्त्यांवरून प्रवास करणे भीतीदायक वाटत आहे. परिणामी या रस्त्यांवरील खड्डे बुझवण्याचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे, अशी सिंग यांची मागणी आहे.
पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव असून गजाननाचे आगमन देखील होणार आहे. सजावटीच्या कारणास्तव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत गणेश मुर्त्या या १० ते १५ दिवस आधीच आणल्या जातात. त्यांना अशा खड्डेमय रस्त्यांवरून या मुर्त्या आणणे फार जिकरीचे होऊन बसते. परिणामी २० ऑगस्ट पूर्वीच खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करून पॅच वर्क केल्यास गणपतीचे आगमन सुखकारक होईल, असेही सिंग यांचे म्हणणे असून त्यासाठी त्यांनी वसई- विरारमधील खड्डेमय रस्त्यांचा लवकरात लवकर आढावा घेऊन रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुझवण्याबाबतचे पत्र वसई- विरार महापालिका आयुक्तांना दिले आहे.