वसईः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत वसई-विरार महापालिका मुख्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसईतील विविध प्रश्नांवर आयुक्तांसह अधिकार्यांना धारेवर धरत शिव्यांची लाखोली वाहिली. संताप अनावर झालेल्या आमदारांनी कमिशनरसाहेब, ऑफिसमध्ये येऊन फटकावीन, असा सज्जड दम भरत कामात सुधारणा करण्याची तंबीच दिली. शहरातील अनधिकृत बांधकामे, अनियमित पाणीपुरवठा, अनधिकृत पार्किंग व फेरीवाले, महावितरणचा गैरकारभार अशा विविध समस्यांवर जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर प्रशासनाला प्रश्न केले. जनतेच्या या प्रश्नांचा प्रशासनातील अनेक अधिकार्यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. सदर खुलाशाने प्रश्नकर्त्यांचे; किंबहुना स्वत:चेही समाधान होत नसल्याचे पाहून आमदारांनी भर सभागृहात उपस्थित आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकार्यांना शिव्यांची लाखोली वाहिली.
साडेतीन वर्षांत प्रशासनाने शहराची वाट लावली, अशा शब्दात ठाकूरांनी अधिकार्यांची खरडपट्टी काढली. नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचल्यानंतर आमदार ठाकूर यांचा संतापाचा कडेलोट झाला. संतापाच्या भरात त्यांनी आयुक्तासंह सर्वच अधिकार्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत समाचार घेतला. एका समस्येवर उत्तर देण्यासाठी उपायुक्त चारुशिला पंडित यांनी उभे राहून बोलायचा प्रयत्न केला असता आमदार त्यांना ए शहाणपणा करू नकोस. मला पोपटांकडून उत्तर नको, आयुक्तांकडून पाहिजे, असे सुनावत आमदारांनी थेट आयुक्तांनाच, तू कशाला आहेस इकडे?, असेही सुनावले.