घरपालघर‘त्या’ नुकसानग्रस्त 35 शेतकऱ्यांना भरपाई मंजूर

‘त्या’ नुकसानग्रस्त 35 शेतकऱ्यांना भरपाई मंजूर

Subscribe

कुडे येथील १२.६४ हेक्टर क्षेत्र व बोट येथील १.७५ हेक्टर असे एकूण १४.३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते.

पालघर : वांद्री मध्यम प्रकल्पामधून रब्बी हंगामापूर्वीच सोडलेल्या पाण्यामुळे पिकांची नुकसानी झालेल्या 35 शेतकर्‍यांचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. लवकरच या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पालघर तालुक्यात वांद्री प्रकल्पालगत हालोली बोट व कुडे ही गावे आहेत. या गावात धरणाच्या पाण्यावर दुबार पिके घेतली जातात. जानेवारी दरम्यान पाण्याची मागणी असण्याआधीच कालव्यातून पाणी सोडल्याने तसेच कालव्याच्या गळतीमुळे 35 शेतकर्‍यांच्या पेरलेल्या विविध रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. कुडे येथील १२.६४ हेक्टर क्षेत्र व बोट येथील १.७५ हेक्टर असे एकूण १४.३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते.

नुकसानी मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी कुणबी सेनेच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले होते. खासदार राजेंद्र गावित यांनीही या प्रकरणात शेतकर्‍यांसोबत असल्याचे सांगून नुकसानीसाठी सरकार स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वस्त केले होते. विश्वनाथ पाटील, अविनाश पाटील, नागरिक व शेतकरी वर्गाने नुकसान भरपाईची मागणी लावून धरल्यानंतर प्रशासनाने ती मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले होते. मनोरच्या पाटबंधारे विभागाने 35 शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाटबंधारे मंडळाकडे प्रस्तावित केले होते. त्यानुसार मंडळाने पालघर तहसिलदार यांच्या पंचनाम्यानुसार 35 शेतकर्‍यांची 1 लाख 96 हजार 270 इतकी नुकसान भरपाई निश्चित केली आहे. प्रती हेक्टरी 13 हजार पाचशे रुपये इतकी नुकसान भरपाई आहे. प्रस्तावातील शेतकरी निहाय नुकसान भरपाई ही १००० ते ६७५० इतकी आहे. १८ शेतकर्‍यांची नुकसान भरपाई अधीक्षक अभियंता स्तरावर आणि १६ शेतकर्‍यांची नुकसान भरपाई कार्यकारी अभियंता स्तरावर तर एका शेतकर्‍यांची नुकसान भरपाई प्रदेश स्तरावरावरून मिळत आहे.

- Advertisement -

प्रति हेक्टर 35 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली होती. मात्र या मागणी संदर्भात मंडळ स्तरावर निर्णय होणे आवश्यक असल्याचे सांगून सद्यस्थितीत मंजूर झालेली नुकसान भरपाई शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. तर वांद्री प्रकल्पांतर्गत वितरण प्रणालीद्वारे बंदिस्त नलिका पद्धतीने शेतकर्‍यांना पाणी देण्याचा प्रस्तावही कोकण पाटबंधारे मंडळाकडे प्रस्तावित केला आहे. असे पत्र मनोर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कुणबी सेनेला माहितीस्तव पाठवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -