पालघरः पालघर जिल्ह्यात सध्या रेल्वेचा विस्तार होत असून, पावसाळ्यात ग्रामस्थांसाठी हा विस्तार अडथळ्याची स्पर्धा ठरत आहे.विकास रेल्वेचा पण भुर्दंड नागरिकांना का? अशा विवणंचनेत नागरिक पडले आहेत. वर्षा न् वर्षे जेथे शेती वाडी करून राहत आले, त्याच भागात जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रेल्वेच्या विस्तारामुळे पालघर तालुक्यातील सफाळे ते पालघर स्थानकांच्या पूर्वेकडील गावांचा संपर्क पूर्णतः तुटला आहे. सफाळे ते केळवे रोड येथील रोठे,करसोदा, मोहळ – डोंगरी पाडा,विवा कुटीर,डोंगर पाडा आणि इतर गाव पाडे यांचा रस्ता बंद झाला आहे. या भागात ३ ते ४ हजार लोकवस्ती असून, या लोकांचा रुग्णालय आणि शाळा या अत्यावश्यक असणार्या घटकांशी संपर्क तुटला आहे.
रेल्वेने आपल्या जागेतून रस्ता तयार करून घेतला आहे. पण, कंत्राटदाराने हा रस्ता बनवताना निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला असून पहिल्याच पावसात रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. या भागात असलेले फाटक बंद करून रेल्वे क्रॉसिंगसाठी भुयारी मार्ग बनवले आहेत. पण, त्यात पावसाळ्यात पाणी भरत असल्याने त्या मार्गातून नागरिकांचे येणे जाणे पूर्णतः बंद झाले आहे. अत्यावशक सेवेसाठी येथील नागरिकांना सध्या शहरातील नातेवाईकांकडे आसर्याला जाऊन राहावे लागत आहे. रेल्वेने बनवलेल्या रस्त्याशेजारी रेल्वेचे गटार खोदलेले असून त्या रस्त्यावर विद्यार्थी जाणार कसे असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे.
०००
आमच्या गावातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता रेल्वेने उपलब्ध करून द्यावा.
–आशिष राऊत, उपसरपंच, माकुणसार, ग्रामपंचायत.
०००
आम्ही रस्ता सुरूच ठेवला आहे. फाटक बंद करून रस्ता बंद केलेला नाही. भुयारी मार्गाचे काम अजून प्रगतीपथावर असून, तेथून रस्ता सुरु केलेला नाही. जो रस्ता पावसामुळे वाहून गेलेला आहे तो तात्काळ दुरुस्त करण्यात येईल. नागरिकांच्या समस्या असल्यास त्या तात्काळ सोडवण्यात येतील.
–व्ही.पी.सिंग,प्रोजेक्ट इन्चार्ज, डी.एफ.सी.सी.रेल्वे