डहाणू: मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथील उड्डाणपुलावर चार वाहने एकमेकांना धडकून अपघात झाला आहे. यामुळे महामार्गावर साधारण 2 तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रविवार 14 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास डहाणू तालुक्यातील आंबोली येथील उड्डाणपुलावर मुंबईकडून गुजरातच्या दिशेला जाणार्या एका कंटेनर, एक आयशर, एक ट्रक आणि एका छोट्या चारकाची वाहनांचा एकमेकांना धडकून अपघात झाला आहे.
उड्डाणपुलावर चढण असल्यामुळे वाहनांचा वेग धिमा होऊन अपघाताची तीव्रता सौम्य होती. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र ही वाहने महामार्गामध्ये असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावर उपाय म्हणून काही काळ वाहतूक पुलाच्या शेजारील सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली होती.