वसई : वसई, विरार शहरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये यासाठी महापालिकेने यंदादेखील शहरातील तलावांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. तलावांऐवजी शहराबाहेर असलेल्या बंद दगडखाणींसह कृत्रिम तलावाच्या पाण्यात विसर्जन केले जाणार आहे. गणेशोत्सव काळात विसर्जनादरम्यान शहरात ठिकठिकाणी कृत्रिम तलाव आणि फिरते हौद उभारले जाणार आहेत. फिरते हौद त्या-त्या ठिकाणी जाऊन गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन करणार आहेत. तसेच शहरातील दोन बंद दगडखाणींत विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे. याची प्रत्येक प्रभागात महापालिका आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव मंडळांच्या बैठकांचे आयोजन करून त्यांना या उप्रकमाबाबत माहिती देण्यात येत आहे. मागील वर्षी महापालिकेच्या कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वी झाला होता. ६३ टक्के मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले होते. त्यामुळे यंदादेखील नागरिक महापालिकेच्या या आवाहनला चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास महापालिका आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेने विसर्जनासाठी वालईपाडा आणि राजीवली येथील बंद असलेल्या दगडखाणी निश्चित केल्या आहेत. उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त समीर भूमकर, उपअभियंता प्रकाश साटम यांनी याठिकाणची पाहणी केली. महापालिकेकडून शहरातील मुख्य मोठ्या २० तलावांमध्ये विसर्जन न करता सदर ठिकाणी कृत्रिम तलाव व मूर्ती संकलन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.
रात्री दहा वाजेपर्यंतच कार्यक्रम आयोजित करावेत
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पारंपरिक तलावांच्या शेजारीच कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. या कृत्रिम तलावांना लागूनच मंडप उभारले जाणार असून मंडपातच भाविकांना पूजा करता येणार आहे. विसर्जनस्थळी गर्दी , गोंधळ होणार नाही यासाठी महानगरपालिकेने पोलिसांबरोबर नियोजन केले आहे. प्रत्येक कृत्रिम तलावांजवळ अग्निशमन, पोलीस दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. नागरिकांना विसर्जनासाठी लांब यावे लागू नये यासाठी महापालिकेकडून ठिकठिकाणी फिरत्या हौदांच्या माध्यमातून विसर्जन करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली. गणेशोत्सव मंडळांनी रात्री दहा वाजेपर्यंतच कार्यक्रम आयोजित करावेत. सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस विभागाच्यावतीने केले आहे.