पालघर : पालघर जिल्ह्यातील पाणी समस्या मिटवण्यासाठी राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारने गतिमानतेने पावले उचलली आहेत. जलजीवन मिशन योजनेमध्ये जिल्ह्यातील 491 गावांमधील 393 योजनांचा समावेश करण्यात आला असून वार्षिक कृषी आराखड्यातील कामांची प्रगती जोमाने सुरू असल्याचे समजते. या योजनांमुळे जानेवारी–फेब्रुवारी दरम्यान तहानलेल्या काही गावांना दिलासा मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यातील काही गावांमध्ये कायमच पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी ऐकू येतात. हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी 393 योजनांपैकी 324 योजनांचा विकास प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो सादरही करण्यात आला आहे. त्यापैकी 300 योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली असून 146 योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही कामे करण्यासाठी पालघर जिल्ह्याचा पाणीपुरवठा विभाग युद्धपातळीवर सज्ज झाला आहे.
तहानलेल्या पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कामांची प्रगती आणि नवीन योजनांचाही समावेश आहे. 491 गावांपैकी 373 गावांमध्ये 324 योजनांची आखणी करण्यात आली आहे. 70 डीपीआर सेक्शन इंजिनिअरकडे पाठविल्यानंतर त्यापैकी 67 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. 491 पैकी 309 गावांना, तर 393 योजनांपैकी 300 योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. सध्याच्या घडीला 4 योजनांच्या तांत्रिक मान्यता देण्यात आल्या नसल्याने पुढील कामांना विलंब झाला आहे. कामांची निविदा प्रक्रियाही शेकडोंच्या संख्येने झाल्या असून कार्यादेश वेगाने देण्यात आले. सध्या 121 निविदांपैकी 41 योजनांना कार्यादेश दिले असून त्या शासन स्तरावरही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
393 योजनांपैकी सर्वांत जास्त योजना वाडा तालुक्यात 101 मंजूर करण्याचे प्रस्तावित असून विक्रमगड – 60, डहाणू – 78, तलासरी – 25, जव्हार – 34, मोखाडा – 41, पालघर 42, तर वसईतील 12 योजनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जुन्या योजनांचीही दुरुस्ती करण्याचे कामही प्रगतिप्रथावर असून त्यांचाही वार्षिक कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सुमारे 245 गावांमध्ये 207 योजनांचा डीपीआर बनविण्यात आला आहे. सध्या 12 प्रस्ताव उपविभागाकडे पाठविण्यात आल्या असून 207 पैकी 194 योजनांचा प्रस्तावात समावेश आहे. 245 गावांपैकी 222 गावांचे प्रस्ताव दाखल झाले असून 189 योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. कार्यादेश देण्यात आलेल्या योजनांची संख्या 171 गावातील संख्या सध्या 173 आहे. त्यापैकी 69 योजनांना कार्यादेश देण्यात आला असून 7 निविदा शासन स्तरावर पाठविल्या आहेत.
प्रतिक्रिया
केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने सर्वांच्या घरामध्ये पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजनेमार्फत प्रभावी योजना असून ऑक्टोबरअखेर सर्व कामांचे कार्यादेश निर्गमित करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून मार्च 2024 पर्यंत हर घर जल योजना राबविण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत योजनांची कामे पूर्ण होतील.
– सिद्धाराम सालीमठ, सीईओ
जिल्हा परिषद पालघर