जव्हार: ग्रामीण भागात रोजगार हमी योजना हे उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वर्षानुवर्षे या योजनेच्या माध्यमातून येथील जनता आपले जीवन कसेबसे जगत आहेत. यंदा रोजगार हमी योजनेच्या मजुरीमध्ये चांगल्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र केवळ १७ रुपयांनी वाढ केल्याने मजुरांनी नेमके जगावे कसे असा प्रश्न पडला आहे.
वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दैनंदिन गरजा भागविणे कठीण होत असताना केंद्र सरकारकडून रोजगार हमी योजनेच्या मजुरीत १७ रुपयांची वाढ करून मजुरीचे दर २७३ रुपये करण्यात आले. परंतु महागाईच्या काळात रोजगार हमी योजनेचे काम करताना दरदिवसाला मिळणार्या २७३ रुपये मजुरीच्या तुलनेत शेतीचे काम करताना मिळणारी मजुरी आणि बांधकामावर मजुरीचे काम करताना मजुरी जादा मिळते. त्यानुषंगाने रोजगार हमी योजनेच्या कामात दरदिवसाला मिळणार्या कमी मजुरीत काम कसे करणार आणि जीवन जगण्यासाठी दैनंदिन गरजांचा खर्च कसा भागविणार, याबाबचा प्रश्न मजुरांकडून विचारला जात आहे.
प्रतिक्रिया
शेतीचे काम किंवा बांधकामावर मजुरीचे काम केल्यास दरदिवसाला ५०० रुपये मजुरी मिळते. तर सरकारच्या रोजगार हमी योजनेचे काम केल्यास दरदिवसाला केवळ २७३ रुपये मजुरी मिळते. त्यामुळे महागाईच्या काळात रोजगार हमी योजनेचे काम करणे परवडणारे नसल्याने, त्यापेक्षा शेतीचे काम आणि बांधकामावर मजुरीचे काम केलेले बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
तूळशिराम तर्हाड,शेत मजूर
प्रतिक्रिया
वाढत्या महागाईच्या काळात रोजगार हमी योजनेचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणार्या मजुरांच्या मजुरी दरात केवळ १७ रुपयांची वाढ दिली आहे. ही काम करणार्याला प्रति दिन २७३ रुपये मजुरी मजुरांची चेष्टा नव्हे काय?
-रामा चौधरी,शेत मजूर