महेश भोये.-डहाणू: केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकसित भागात संकल्प यात्रा हे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून डहाणू सेंट मेरी हायस्कूलच्या मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला. भारत सरकारच्या फ्लॅक्स शिप योजनेचा लाभ हा लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या सहकार्याने एप्रिल 2018 ते ऑगस्ट 2018 या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान राबवले. या योजनेचा लाभ अद्यापी लाभार्थ्यापर्यंत पोहोचला नव्हता. त्यामुळे 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली. पालघरचे जिल्हा अधिकारी गोविंद बोडके यांच्यामार्फत ही योजना पूर्ण जिल्हा भर राबवली जात आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपाल रमेश बैस यांचा स्मृती चिन्ह आणि धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज कपिल पाटील , पालघर जिल्हा पालक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित, डहाणूचे आमदार विनोद निकोले, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम , कोकण विभागीय पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार इत्यादी विशेष अतिथी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पालघर जिल्हा अधिकारी गोविंद बोडके, डहाणू प्रांत अधिकारी संजीता मोहपात्रा , पालघर पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील आणि प्रशासनातर्फे करण्यात आले. या यात्रेत पालघर जिल्ह्यातील ८ तालुक्यांचा समावेश आहे. तर 413 ग्रामपंचायती , नगरपंचायती , महानगरपालिकांमध्ये सुद्धा ही संकल्प यात्रा फिरणार आहे . अनेक योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे
केंद्रातून आणि राज्यातून राबविल्या जाणार्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात हाच या यात्रेचा उद्देश आहे. आदिवासी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध , आदिवासी समुदायासाठी पायाभूत सुविधांची उभारणी ,आदिवासी समुदायासाठी सन्मान अधिकार आणि संधी , अधिक बळकट वन हक्क कायद्यामुळे आदिवासी समुदायाच्या लाभांची सुनिश्चिती , आदिवासी समुदायाचे समीक्षीकरण , आयुष्मान भारत यांसारख्या अनेक योजना राबवून खेड्यापाड्यातील सर्वागीण विकास व्हावा, अशी या यात्रेमागील संकल्पना आहे.