वसई : चेन्नईत आपल्या मित्राचा खून करून वसईत गेली पाच वर्ष लपून बसलेल्या मारेकर्याला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तामिळनाडू पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले. रघू दुघई मंडल असे त्याचे नाव आहे.
चेन्नईमधील तम्बरममधील एका बफींगच्या कारखान्यात रघु मंडल आणि अनिल चौधरी एकत्र काम करत होते आणि एकाच खोलीत रहात होते. मात्र, त्यांच्यात अनेकदा भांडणे होत होती. अशाच एका भांडणात १४ सप्टेंबर २०१८ च्या रात्री झोपलेल्या अनिल चौधरीची चाकूने गळा चिरून हत्या करून रघु मंडल फरार झाला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात केलमबक्कम पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तामिळनाडू पोलीस तेव्हापासून त्याच्या मागावर होते. अनेकदा तामिळनाडू पोलिसांनी बिहार राज्यात त्याचा शोध घेतला होता. पण, तो पोलिसांना गुंगारा देत पसार होत होता.
रघू मंडल वसई परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून तामिळनाडू पोलिसांचे विशेष पथक वालीव पोलीस ठाण्यात आले होते. वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मदतीने रघुला वालीव येथील एका बफींग कंपनीतून अटक केली. रघुला ताब्यात घेऊन तामिळनाडू पोलीस चेन्नईला रवाना झाले.