घरपालघरकुडूसची पाणी योजना रखडली; नऊ वर्षानंतरही योजना बंदच

कुडूसची पाणी योजना रखडली; नऊ वर्षानंतरही योजना बंदच

Subscribe

तालुक्यातील कुडूस हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला जुनी पाणी योजना अपुरी पडत असल्याने येथे २०१४ मध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली.

वाडा तालुक्यातील कुडूस हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला जुनी पाणी योजना अपुरी पडत असल्याने येथे २०१४ मध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. जानेवारी २०१४ मध्ये योजनेचे कामही सुरू करण्यात आले. मात्र या ना त्या कारणाने योजनेचे काम रखडले असून नऊ वर्षानंतरही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आणखी काही काळ नागरिकांना पाण्याची वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येते आहे. कुडूस परिसरात डी प्लस झोनमुळे अनेक कारखाने आले आहेत. कारखानदारांमुळे येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पूर्वी फक्त कुडूस हे छोटेसे गाव होते. जेमतेम सात ते आठ हजार लोकवस्ती होती. मात्र गेल्या काही वर्षात कुडूस गावासह पाच ते सहा उपनगरे वाढली. सतत वस्ती वाढत आहे. आजमितीला ३० ते ३५ हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे.

महावितरण कंपनीकडे ही पाणी योजनेच्या विद्युत मीटरसाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यासाठी पैसेही भरण्यात आले आहेत. विद्युत मीटर मिळताच पाणी योजना सुरू करण्यात येईल.
– संदेश बुटाला, ठेकेदार

- Advertisement -

कुडूस चिंचघर येथे मोठ्या शैक्षणिक संस्था असल्याने परिसरातील नागरिक चांगल्या शिक्षणासाठी मुलांचे कुडूस येथील शाळेत प्रवेश घेत असल्याने ते तेथेच वस्ती करतात. या कारणामुळे वाढत्या वस्तीला कुडूसची जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत होती. उपनगरांना पाणीपुरवठा न झाल्याने येथील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन सरपंच कुमार जाबर व उपसरपंच मिलींद चौधरी यांनी प्रयत्न करून ५ कोटी रुपये किंमतीची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. तिचे भूमीपूजन मोठा गाजावाजा करत तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

१८ जानेवारी २०१४ साली या योजनेचे काम सुरू करण्यात आले असून या योजनेच्या कामासाठी दोन वर्षाचा काळावधी देण्यात आला होता. मात्र पहिल्यांदा पाण्याची टाकी व जलशुद्धीकरणासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने काम रखडले होते. त्यानंतर पाईपलाईन निकृष्ठ दर्जाची केली असल्याचा आरोप करत या योजनेचे काम थांबले होते. आता योजना पूर्ण झाली असून त्यासाठी विजेची मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्युत मीटर मिळताच पाणी योजना सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात योजना सुरू करण्यात येईल.
– अनिरुद्ध पाटील, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कुडूस    

कुडूस ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच मिलिंद चौधरी यांच्या काळावधीत ही पाणी योजना मंजूर झाली. तिचे काम २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर २०१६ ला त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपली. २०१६ ला ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत चौधरी यांच्या गटाचा पराभव होऊन ग्रामपंचायतीवर दुसऱ्या गटाची सत्ता आली. त्यानंतर २०२१ साली दुसऱ्या गटाचाही कार्यकाळ संपला तरी ही योजना पूर्ण करता आली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधीचे अपयश याकामी दिसून आले.

हेही वाचा –

राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -